शहर वार्ताहर/ राजापूर
तालुक्यातील भालावली येथील श्री लक्ष्मी माधव मंदिरातील झालेल्या चोरीसंदर्भात श्वानपथक पाचारण करूनही काहीच माग लागलेला नाही. त्यामुळे या चोरी प्रकरणी अद्यापही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
तालुक्यातील भालावली पिशेदवाडी येथील श्री लक्ष्मी माधव मंदिरात मंगळवारी रात्री चोरी झाली होती. त्यामध्ये तीन चांदीचे मुखवटे सोन्याचा मुलामा दिलेल्या 2 साखळ्यांसह मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरटय़ांनी लंपास केली होती. सुमारे 1 लाखाच्या आसपास ऐवज चोरीला गेला आहे. त्या घटनेनंतर परिरसरात जोरदार खळबळ उडाली होती. घटनेची दखल घेऊन नाटे पोलिसांनी तपासाला सुरूवात केली होती. मात्र 2 दिवस लोटले तरी अद्याप अज्ञात चोरटय़ांपर्यंत पोलीस पोचलेले नाहीत. दरम्यान मंदिरात चोरी झाल्यानंतर श्वानपथकासह ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. गावातील गुरववाडी तिठय़ापर्यंत श्वानपथक पोहोचले होते. चोरटय़ांनी मंदिरातून लांबवलेला पेटारा त्याच परिसरात फोडून आतील ऐवज लांबवून पेटारा तेथेच टाकून पसार झाले होते. त्या ठिकाणापर्यंत श्वानपथक काही वेळ घुटमळले व नंतर माघारी फिरले. त्यामुळे पोलिसांच्या हाती काहीच सापडले नाही. संबधित मंदिरात सीसीटीव्ही नसल्याने अज्ञात चोरटय़ांचा माग काढणे कठीण बनले आहे. पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.