‘आजचा दिवस खूप छान गेला, आज सगळी कामे अगदी भराभर आवरली. वातावरणही छानच आहे आज! किंवा, आज अगदी कंटाळा आलाय उदासच वाटतंय. गप्प बसून रहावं असंच वाटत आहे’ अशी वाक्मये आपण अनेकदा ऐकत असतो आणि बोलतही असतो. एखादी बोलकी व्यक्ती एकदम शांत असेल तर त्या व्यक्तीचे काहीतरी बिनसले आहे हे आपल्या लक्षात येते.
कधी उत्साही वाटणे, कधी कंटाळा, मरगळ असे भावनांचे रंग आपण सारेच अनुभवत असतो. काहीवेळा बाह्य कारण काहीच नसते परंतु तरीही कधीतरी मूड नसतो, उदास वाटते. अर्थात असे होऊ शकते, कारण आपल्या मेंदूतील आणि शरीरातील रसायने सतत बदलत असतात. मेंदूतील सेरेटोनीन हे रसायन चोवीस तासात सतत बदलत असते. त्यानुसार आपल्या भावना बदलतात. निसर्गातील वातावरण जसे बदलते तसेच अगदी नैसर्गिकरीत्या आपली मनस्थिती बदलत असते. पहा आपल्या श्वासाची गती, रक्तदाब, पाचक स्राव हे देखील दिवसभरात बदलत असतात. जसे शरीरात नैसर्गिकरीत्या बदल होतात तसेच मनाच्या स्थितीतही होतात. आपण सदा सर्वकाळ आनंदी असू शकत नाही. ज्यावेळी आपण आनंदी असतो त्यावेळी आपले कुटुंब, गाव, निसर्गातील अगदी छोटीशी गोष्टही आपल्याला आनंद देते. एखादे काम वाढले तरी ते सहज केले जाते. पाणी गेले, कप फुटला अशा छोटय़ाछोटय़ा गोष्टी आपण असू दे.. त्यात काय एवढे चालायचेच म्हणून सोडून देतो. परंतु मूड ठीक नसेल तर मात्र गॅसच संपला, पाणी गेले, इतकेच काय तर साधी खुर्ची ओढताना खर्रर्र असा आवाज झाला तरी आपण वैतागतो, चिडतो. खरंतर आपण सारेच कमी अधिक फरकाने असेच असतो. कधीतरी काही बिनसणे, मूड नसणे हे अगदी नैसर्गिक आहे. परंतु मनाची ही भरती ओहोटी सातत्याने सुरू राहिली तर मात्र गोंधळ होतो. हे बिनसणे वा बिघडणे वारंवार होऊ लागले तर मानसिक आणि पर्यायाने शारीरिक आरोग्यही धोक्मयात येऊ शकते.
भावना कुठलीही असली तरी तिची तीव्रता, वारंवारता, कालावधी या तीन निकषांच्या आधारे मानसिक आरोग्याचा विचार करण्यात येतो. म्हणजे, समजा एखाद्याला ‘राग’ आला. त्या रागाची तीव्रता अधिक असेल तर बेभानपणे एखादी कृती केली जाते. उदा. जेवताना केस दिसला..ताटच भिरकावून दिले.. इ. हे चिडणे, राग येणे रोजच होत असेल, बारीक सारीक गोष्टींवरून संताप होत असेल तर रागाची वारंवारता जास्त आहे असे म्हणता येईल. अशाच रागामुळे झालेल्या एखाद्या भांडणातून वर्षानुवर्षे लोक अबोला धरतात. बराच काळ तो राग तसाच टिकून राहतो. म्हणजेच तो अधिक काळ राहिला. मनाची भरती ओहोटी समजून घेताना कोणत्याही भावनेच्या बाबतीत या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.कोणतीही भावना टोकाची नसावी. सामान्यपणे कोणतीही भावना ज्यावेळी विरुप पातळीवर जाते त्यावेळी ती भावना नीट हाताळता न येणे हे त्यामागचे कारण असते. भावना विरुप पातळीवर जाऊ नये यासाठी त्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. आनंदामुळे उल्हसित वाटणे स्वाभाविक आहे परंतु हर्षवायु हे आनंदाचे विरुप आहे. म्हणजेच कोणत्याही भावनेचा अनुभव जेवढा तीव्र असेल तेवढी ती व्यक्ती भावनेच्या आहारी जाते व परिणामी वास्तवापासून दूर राहते. भावनांमुळे काही चेतना, संवेदना निर्माण होत असतात. आपल्या वागण्यावर, शरीरावर त्या परिणाम करत असतात. कारण भावना उत्पन्न होत असताना शरीरातही अनेक रासायनिक प्रक्रिया होत असतात त्याचे परिणामही दिसतात. भीती वाटली की घशाला कोरड पडणे, हातापायातील त्राण जाणे, पोटात गोळा उठणे, लघवी वा शौचावरील नियंत्रण जाणे, दरदरून घाम फुटणे इ. राग आला की डोळे लाल बुंद होणे, डोके जड होणे, अंगाची थरथर होणे हे सारे तीव्र भावनांचे प्रकट आविष्कार आहेत असे म्हणता येईल. राग, चिंता, काळजी, ताण, निराशा या भावनांचा कालावधी अधिक असेल तर शरीरातील अंतस्रावी ग्रंथींच्या कार्यात असमतोल निर्माण होऊन अनेक मनोशारीरिक विकार उत्पन्न होऊ शकतात. आम्लपित्त, बद्धको÷ता, रक्तदाब, मधुमेह, डोकेदुखी आदि विकारांची कारणे काही अंशी तरी भावनिक असमतोलात असू शकतात.
दैनंदिन जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही स्वरुपातील भावना वेगवेगळय़ा अनुभवातून निर्माण होत असतात. समाधान, आनंद, राग, भीती, दु:ख, चिंता, औदासिन्य, प्रेम, अपराधीपणा, मत्सर अशा अनेक भावना आपण अनुभवत असतो. यापैकी विधायक भावना जोपासणे आणि विघातक स्वरुपाच्या भावना कमी करणे हे भावनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भावनिकदृष्टय़ा परिपक्व असणे, स्थिर असणे हे व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक आहे.
भावनिक आरोग्य चांगले राहण्यासाठी सकारात्मक-नकारात्मक अशा दोन्ही भावनांची जाण असणे आवश्यक आहे. प्रेम, आनंद, विश्वास, आशा याबरोबरच भीती, चिंता, नैराश्य यांच्या अनुभवाने व्यक्तीच्या मनामध्ये एकप्रकारचा भावनिक कोष वा संचय तयार होत असतो. भावनिक आरोग्याच्या दृष्टीने तो समृद्ध असणे गरजेचे आहे. परंतु सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कोणत्याही भावनेचा अतिरेक मात्र हानिकारक ठरतो. भावनिक आरोग्याच्या दृष्टीने विधायक आणि सुखद भावनांचे संवर्धन करणे जसे आवश्यक आहे तसेच दु:खद, विघातक भावनांची तीव्रता वाढणार नाही यासाठी सजग असणे गरजेचे आहे. यासाठी आपण आपली वैफल्य सहिष्णुता अर्थात फ्रस्ट्रेशन ट्रॉलरन्स वाढविणे गरजेचे आहे.
स्वतःबद्दल सकारात्मक विचार करणे, स्वतःला स्वतःमध्ये आहेत त्या गुण दोषांसकट स्वीकारून त्यात बदलाची तयारी ठेवणे हे मानसिक आणि भावनिक आरोग्य प्राप्त करण्यासाठी व ते टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. परंतु स्वतःला समजून घेण्यासाठी मनात येणारे विचार, भावना याबद्दलची जाणीव, सजगता महत्त्वाची आहे. विचारांची जळमटे, भावनांचा आवेग, भावनांच्या आवेगात घडणारी कृती, होणारा मनस्ताप हे जर टाळायचे असेल तर सजगतेची काही तंत्रे आत्मसात करणे गरजेचे आहे. आता आपल्या मनात ही भावना आहे याची जर नोंद करता आली तर त्या भावनेची तीव्रता कमी होण्यास मदत होते. कारण ज्यावेळी आपण मनातल्या भावनेला नाव देतो त्यावेळी आपण स्वतःला त्या भावनेपासून वेगळे करत असतो. हीच गोष्ट विचारांच्या बाबतीतही आहे.
माईंडफुलनेसच्या म्हणजेच सजगतेच्या तंत्रानी आपल्या भावना, विचार हे न्याहाळणे जमू लागते. साक्षीभाव विकसित होतो. माईंडफुल असणे म्हणजे काय?त्याचा नेमका उपयोग कसा होतो? ती तंत्रे कोणती याविषयी पुढच्या लेखात जाणून घेऊया.