मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची वागणूक आणि न्याय मागणाऱ्यांवर केली जात असलेली दमदाटी सर्वांनी पाहिली. या घडलेल्या प्रकारावर आता शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी भास्कर जाधव यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
चिपळूणमध्ये झालेल्या घटनेबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले,भास्कर जाधवांबाबत मी पाहिलं नाही; वृत्तपत्रांमध्ये वाचलं. त्यामुळे त्या सगळ्यावर तेच बोलतील. पण या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणे गरजेचं आहे. लोकांचा आक्रोश वेदना समजून घेणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री आणि सरकार हे करत आहे, अशी भूमिका संजय मांडत राऊत यांनी मांडली.
संजय राऊत यांनी मुंबईतील धनिक लोकांनी महाराष्ट्रासाठी पुढं यावं, असं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती आहे. लाखो लोक बेघर झालेले आहेत, मोठे नुकसान झालं. अनेकांचे जीव गेले आणि त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत त्या सगळ्यांना आता सावरायचं आहे. मुंबई शहरात अनेक धनिक लोक आहेत, त्यांनीसुद्धा जास्त लक्ष महाराष्ट्राकडे द्यावं. महाड, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे गावं उद्ध्वस्त झाली आहेत. त्या गावांना आता पुन्हा एकदा उभं करावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.
राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. पण ही सगळ्यांची जबाबदारी आहे, महाराष्ट्राने ज्याला कोणाला दिले, त्या सगळ्यांची जबाबदारी आहे ती महाराष्ट्राला उभं करायची. राज्याला सहस्त्र हातांनी मदत होणे आवश्यक आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीमध्ये मुंबईचे अनेक जण आहेत. त्यांनी सुद्धा मदत करायला हवी, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.
काय आहे हा प्रकार ?
चिपळूणमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत दौऱ्यात असणारे भास्कर जाधव यांच्यावर महिलेसोबत अरेरावी केल्याने सध्या टीका होत आहे. आपल्याला मदत करा, हवं तर आमदारांचा एक दोन महिन्याचा पगार देऊ नका अशी विनंती करणाऱ्या महिलेसोबत भास्कर जाधव यांनी अरेरावी केली. आमदारांचा सहा महिन्यांचा पगार दिला नाही तरी काही फरक पडत नाही सांगत महिलेच्या मुलाला आईला समजाव असं सांगतानाचा त्यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.