भिलवडी प्रतिनिधी
भिलवडी गावच्या सरपंचपदी विद्या सचिन पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून, गावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन विकास कामे करणार असल्याचा निर्धार विद्या पाटील यांनी व्यक्त केला.
2019 मध्ये ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुका झाली. यामध्ये काँग्रेस प्रणित ग्राम विकास खंडोबा पॅनेलने बहुमत मिळविले. यानंतर सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने या ठिकाणी सौ . सविता महिंद पाटील त्यांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली होती. यानंतर वर्षभराच्या कार्यकालामध्ये सविता महिंद पाटील यांच्या संयमी नेतृत्वाखाली सुमारे तीन कोटी रुपयांची विकासकामे केली असल्याचे बोलले जात आहे. उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून विविध प्रकारचे उपक्रम भिलवडी ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येत आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम व करण्यात येत असलेली विकास कामे यांचा आलेख उंचावण्याची मोठी जबाबदारी, राजकीय वारसा व अनुभव असलेल्या विद्या पाटील यांच्यावर आली असून, त्या उच्च शिक्षित व अनुभवी असल्याने त्यांच्या राजकीय अनुभवाचा व शिक्षणाचा फायदा भिलवडी वासीयांना होईल अशी अपेक्षा भिलवडी ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.