ऑनलाईन टीम / भिवंडी :
भिवंडीतील जीलानी इमारतीचा भाग कोसळून सोमवारी झालेल्या भीषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 39 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 25 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. त्यांना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान मदतकार्यात गुंतले असून मागील 50 तासांपासून बचावकार्य सुरुच आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड येथील ही तीन मजली जीलानी इमारत पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून दुर्घटना घडली होती. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 25 कुटुंबातील 70 ते 80 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. महत्त्वाची बाब म्हणजे मृतांमध्ये सर्वाधिक लहान मुले आहेत. आता या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 39 वर पोहोचला आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ठाकरे सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत तर जखमींवर मोफत उपचार केले जातील असे सांगण्यात आले आहे.