ऑनलाईन टीम / नाशिक :
शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात पूर आल्याने त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन निधीतून नांदगावला मदत करण्याची मागणी केली होती. मात्र, भुजबळांकडून मदत न मिळाल्याने सुहास कांदे यांनी भुजबळांवर जिल्हा नियोजन विकास निधी विकल्याचा आरोप करत थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
जिह्याचे पालकमंत्री म्हणून पूरपरिस्थितीत नांदगावला तातडीची मदत करण्याची मागणी आमदार कांदे यांनी भुजबळ यांच्याकडे केली होती. त्यावर 11 सप्टेंबरला भुजबळ यांनी नांदगावची पाहणी केली. मात्र निधी देण्यास नकार दिला. त्यामुळे
कांदे आणि भुजबळ यांच्यात संघर्ष सुरू झाला. दरम्यान, अद्यापही हा निधी मिळाला नसल्याने कांदे आक्रमक झाले असून, त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी भुजबळांविरोधात थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.