प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून जेएमएफसी न्यायालयाकडे जाण्यासाठी तयार करण्यात आलेला भुयारीमार्ग कुचकामी ठरला आहे. हा भुयारीमार्ग विनावापर असल्याने त्याकडे साफ दुर्लक्ष झाले असून नुकत्याच झालेल्या पावसामुळे तुडुंब भरला आहे. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
मुख्य जिल्हासत्र न्यायालयाकडून जेएमएफसीकडे ये-जा करण्यासाठी या भुयारीमार्गाची उभारणी करण्यात आली. यासाठी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र हा भुयारीमार्ग योग्यप्रकारे करण्यात आला नाही. वकिलांना विश्वासात न घेताच भुयारीमार्गाची उभारणी करण्यात आली. भुयारीमार्गातून आल्यानंतरही रहदारीचा रस्ता ओलांडूनच ये-जा करावी लागत होती. त्यामुळे समस्या निर्माण झाली. वकिलांचा विरोध असतानाही भुयारीमार्गाची उभारणी करण्यात आली.
आता या भुयारीमार्गामध्ये पावसाचे पाणी साचून रहात आहे. ते पाणी काढण्यासाठी खर्च करावा लागत आहे. एकूणच हा भुयारीमार्ग असून अडचण नसून खोळंबा, अशाच परिस्थितीचा झाला आहे.