बनावट कागदपत्रांची हैदोस : मृतांचे डमी केले जातात उभे, बेळगाव-खानापूर तालुक्यात अनेक टोळय़ा सक्रिय
प्रतिनिधी /बेळगाव
दुनिया झुकती हैं झुकानेवाला चाहीए असे म्हणतात. याचा प्रत्यय बेळगाव, खानापूर परिसरात रोज पहायला मिळतो आहे. भूमाफियाच्या कारनाम्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. एकाची जमीन दुसऱयाला विकून दलाल मूळ मालक आणि खरेदीदार या दोघांनाही टोप्या घालत आहेत. या फसवणुकीच्या धंद्यात कोटय़वधी रुपयांची उलाढाल सुरू आहे.
बेळगावला सध्या जमिनीचे दर वाढले आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत खरेदीदाराला आणि मूळ मालकाला ठकविणाऱया टोळय़ा कार्यरत झाल्या आहेत. खानापूर तालुक्मयात शेतजमीन व बेळगाव शहर व परिसरात भूखंड देण्याचे सांगून कोटय़वधी रुपयांचा गंडा घातला जात आहे. या व्यवहारात उपनोंदणी कार्यालयातील काही अधिकारीही सामील असल्याची माहिती मिळाली आहे.
एका बेळगाव शहरात अशा अनेक टोळय़ा कार्यरत आहेत. एखादी जमीन किंवा भूखंड यांचा खूप दिवस वापर नसेल तर त्याचा मूळ मालक कोण? याची चौकशी केली जाते. या जमिनीचा उतारा काढला जातो. बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने त्याची विक्रीही होते. या व्यवहारात ब्लॅक अँड व्हाईटचा खेळ खेळला जातो. कर चुकविण्यासाठी केवळ सात-आठ लाख रुपयांचा व्यवहार दाखवून उर्वरित रक्कम
ब्लॅकमध्ये घेतली जाते.
कोटीची मालमत्ता निम्म्या किमतीने मिळणार म्हणून खरेदीदारही उत्सुकता दाखवितो. उपनोंदणी कार्यालयात सेलडीडही होते. जागेवर न जाता हे सर्व व्यवहार परस्पर बाहेरच होतात. प्रत्यक्षात जागेवर कब्जा घेताना मूळ मालक कोण? याचा उलगडा होतो. दलालांकडे भूखंड खरेदी केलेले उघडे पडतात. प्रकरण पोलीस स्थानकात जाते. हे सिव्हिल मॅटर आहे, तुम्ही न्यायालयात जा, असे सांगत पोलीसही त्यांना फुटवतात.
खानापूर, बेळगाव, मच्छे, पिरनवाडी परिसरात बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री करून खरेदीदारांना कोटय़वधी रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकार घडले आहेत. जमीन नको, दिलेले पैसे तरी परत द्या, म्हणून खरेदीदार पोलीस स्थानकाच्या चकरा कापताना दिसत आहेत. यामध्ये काही माजी गुंड आणि पांढरपेशा गुन्हेगारांचाही सहभाग आहे.
आपण फशी पडलो, हे लक्षात आल्यानंतर खरेदीदार दिलेले पैसे वसूल करण्यासाठी तगादा लावतो. 50 लाखांच्या बदल्यात त्याला दोन-तीन महिन्यांतून एक ते दीड लाख रुपये देऊन त्याचे समाधान करण्याचे प्रयत्न केले जातात. पूर्ण पैसे तर मिळतच नाहीत. सध्या अडचण आहे, नंतर पैसे परत करतो, असे सांगत त्यांना ताटकळत ठेवतात. संपूर्ण व्यवहारच बोगस असल्यामुळे खरेदीदार या टोळीच्या जाळय़ात चांगलाच अडकतो.
उपलब्ध माहितीनुसार रोज असे व्यवहार करणाऱया किमान पाच-सहा मोठय़ा टोळय़ा कार्यरत आहेत. मूळ मालक बेळगावात नसला तरी त्याचा जीपीए आमच्याकडे आहे. आम्हीच या प्रकल्पासाठी गुंतवणूक केली आहे, असे सांगत खरेदीदारांना कोटय़वधी रुपयांना गंडविण्यात येत आहे. एकच जमीन अनेक जणांना विकण्यात येत आहे. याकामी उपनोंदणी कार्यालय आणि पोलीस दलातील काही अधिकारी अशा टोळय़ांना मदत करतात. म्हणून त्यांचा व्यवसाय जोरात सुरू आहे.
मच्छे परिसरातील जमिनीचा व्यवहार
उपलब्ध माहितीनुसार अलीकडेच मच्छे परिसरातील एका 100 गुंठे जमिनीचा व्यवहार ठरला. यामध्ये भूमाफियाच सक्रिय होते. मूळ मालक कारवार जिल्हय़ात राहतो. त्याला पत्ता नसताना काही ठकसेन त्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करतात. व्यवहारासाठी गिऱहाईकांना जाग्यावर बोलावतात. व्यवहारही होतो. खरेदीदार या टोळीतील गुन्हेगारांना 30 लाख रुपये देतो. ही जमीन त्यांची नाही. मूळ मालक भलताच आहे, हे खरेदीदाराच्या लक्षात येताच व्यवहार मोडला जातो. पैसे परत करण्यासाठी तगादा लावला जातो. काही जुजबी रक्कम परत करून खरेदीदाराला गप्प बसविण्यात आले आहे.
अनेक खरेदीदार सध्या कंगाल
बेळगाव परिसरात असे अनेक प्रकार घडले असून नागरिकांचा पैसा भूमाफियांकडे अडकला आहे. स्वस्तात जमीन मिळते म्हणून आशेने गुंतवणूक करण्यासाठी जाणाऱयांना मोठा फटका बसतो. पोलीस स्थानकात दाद मागितल्यावर तुमचे सिव्हिल मॅटर आहे, न्यायालयात जा, असे सांगत त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जातो. अशा परिस्थितीमुळे अनेक खरेदीदार सध्या कंगाल झाले आहेत. भूमाफियातील गुन्हेगारांनी मात्र एकापाठोपाठ एक सावजाला ठकविण्याचे सत्र सुरूच ठेवले आहेत.
जेव्हा मृत जमीनमालक जिवंत होतो…
खानापूर तालुक्मयातूनही जमीन व्यवहारासंबंधी अनेक तक्रारी ऐकायला मिळत आहेत. बेळगावात भूखंडाचे दर वाढल्याने या परिस्थितीचा फायदा घेत कमी किमतीत मोक्मयाच्या ठिकाणी जागा देण्याचे सांगून खरेदीदाराला ठकविणाऱया टोळय़ा मोठय़ा प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने एकाची जमीन दुसऱयाला विकण्यात येते. काही वेळा तर मूळ मालकाच्या मृत्यूनंतर त्याच वयाच्या भलत्याच व्यक्तीला उभे करून व्यवहार उरकल्याचेही प्रकार घडतात. एक-दोन वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेला जमीन मालक खरेदी व्यवहारासाठी मात्र पुन्हा जिवंत होतो, ही या भूमाफियांची करामत म्हणावी लागेल. सरकारी यंत्रणेच्या साहाय्यानेच ही कृत्ये सुरू असून अनेक पोलीस स्थानकात जमीन व्यवहारात मांडवली करून भूमाफियांच्या बाजूनेच निकाल देण्याचे प्रकारही सुरू आहेत. नूतन पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या हे तरी बेळगाव येथील भूमाफियांचे कंबरडे मोडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.