कोरोनाची बहुप्रतीक्षित लस जसजशी जगामध्ये उपलब्ध होते आहे तसतसे लोक पुन्हा निर्धास्त होऊन जीवन जगण्याचे मनसुबे रचत नित्य व्यवहार करू लागले आहेत. लोकांना वाटू लागले आहे की कोरोनावर आपण मात केली म्हणजे जणू काही मृत्युवरच मात केली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे जगामध्ये जवळजवळ 40 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये 6 लाखापेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले तर भारतामध्ये जवळजवळ 4 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. पण स्थिती ही आहे की आजही अंदाजे दीड लाख लोक दररोज मृत्यूला शरण जातात. त्यामध्ये हृदयविकाराने 48 हजार, कॅन्सरने 26 हजार, श्वसन रोगाने 10 हजार लोकांचा मृत्यू होतो. हा आकडा कोरोनामुळे होणाऱया मृत्यूपेक्षा कितीतरी जास्त आहे. यावरून हे सिद्ध होते की कोरोनाच्या लसीमुळे जरी आपण वाचलो तरी मृत्यू अटळ आहे. गेल्या दीड दोन वर्षांपासून जगामधील प्रत्येकजण मृत्यूच्या भीतीनेच ग्रासला आहे. पण मृत्यूपासून आपण कसे मुक्त व्हावे याचे ज्ञान या जगातील कोणत्याही विद्यालयातून शिकवले जात नाही. भारताकडे हे ज्ञान वैदिक काळापासून आहे. पण दुर्दैवाने आजही आपण या अत्यंत महत्त्वाच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करीत आहोत. कमीत कमी भारतीयांनी तरी या ज्ञानाचा स्वीकार करावा, समजून घ्यावे, वैयक्तिक जीवनात पालन करावे व सर्व जगाला मार्गदर्शन करावे. मृत्यूबद्दल गीतेमध्ये काय म्हटले आहे ते आपण पाहू.
भगवतगीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, (भ.गी.2.27) जातस्य हि ध्रुवो मृत्युर्धुवं जन्म मृतस्य च । जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. याच अध्यायात गीता आत्मा आणि शरीर यातील फरक समजावून सांगते. मृत्यू शरीराचा होतो, आत्म्याचा नाही. हे आत्मज्ञान समजून घेऊन त्याप्रमाणे आपण जीवन व्यतीत केले तर आपले मृत्यूपासून रक्षण होऊ शकते. आपण सर्वजण आत्मा या दृष्टीने भगवान श्रीकृष्णाचे सनातन अंश आहोत परंतु याचा आपल्याला विसर पडल्याने पुनः पुन्हा या मृत्युला इच्छा नसतानाही सामोरे जावे लागते. ज्यांना खरोखरच प्रामाणिकपणे मृत्यूपासून स्वतःला वाचवायचे असेल तर भगवान श्रीकृष्ण उपाय सांगत आहेत. (भ.गी.12.7) तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् । भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् माझ्याठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा, हे पार्थ, मी जन्ममृत्युरूपी संसारसागरातून त्वरित उद्धार करतो. मनुष्यजन्माचा जर इतिहास बघितला तर त्याचे आयुष्य दुःखाने भरलेले आहे, केवळ क्षणिक सुख मिळत राहते म्हणून या दुःखांचा आपल्याला विसर पडतो म्हणून बुद्धिमान माणसाने हे जग कसे दुःखमय आहे हे गीता-भागवतसारख्या वैदिक ग्रंथातून समजून घेतले पाहिजे. यासाठी भगवान श्रीकृष्ण भगवतगीतेमध्ये वचन देतात की (भ.गी.8.15) मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् । नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत, कारण त्यांना परम सिद्धी प्राप्त झालेली असते.
याच गीता भागवत ज्ञानावर आधारित संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात शरीर काय आहे आणि या शरीराचा उपयोग कसा करावा याबद्दल सांगताना म्हणतात, शरीर दुःखाचे कोठार । शरीर रोगाचे भांडार । शरीर दुर्गंधीची थार । नाही अपवित्र शरीरा ऐसे ।।1।। शरीर उत्तम चांगले । शरीर सुखाचे घोसुलें । शरीर साध्य होय केले । शरीरे साधले परब्ररह्म ।।2।। शरीर विटाळाचे आळे । माया मोहपाश जाळे । पतन शरीराच्या मुळे । शरीर काळे व्यापले ।।3।। शरीर सकळही शुद्ध । शरीर निधींचाही निध । शरीर तुटे भवबंध । वसे मध्यभागी देव शरीरा ।।4।। शरीर अविद्येचा बांधा । शरीर अवगुणांचा रांधा । शरीरी वसे बहुत बाधा । नाही गुण सुधा एक शरीरी ।। 5।। शरीरा दुःख नेदावा भोग । न द्यावे सुख न करी त्याग । शरीर वोखटे ना चांग । तुका म्हणे वेग करी हरिभजनी ।। 6।। याचा अर्थ असा आहे की शरीर हे दुःखाचे कोठार आहे. शरीर हे रोगाचे भांडारगृह आहे, शरीर हे दुर्गंधीला आधार आहे, शरीरासारखे दुसरे अपवित्र काही नाही. मनुष्याचे शरीर हे परमार्थ करायला अति उत्तम आहे. शरीर हे सुखाचा घड आहे. शरीर ज्याची प्राप्ती करून घेईल ते होईल. शरीराने परब्रह्माची प्राप्ती होते. शरीर हे केवळ स्त्रीच्या विटाळानेच गोठलेले असून जिवाच्या अधोगतीला तेच कारण आहे व ते मोहमायारूपी पाशाचे जाळे आहे, त्यास काळाने व्यापले आहे. शरीर हे अति निर्मळ आहे व ते परमार्थ धनाचा ठेवा आहे व शरीरामध्ये देव वसत आहे, म्हणून त्याच्या योगाने संसाररूपी पाशाचे छेदन होते. शरीर अविद्येचाच बांधा असून सर्व वाईट गुणाचे मिश्रण आहे व शरीरामध्ये अनेक प्रकारच्या दुर्गुणाच्या बाधा आहेत, त्यामध्ये एकही चांगला गुण नाही. अशा या शरीराला अनेक प्रकारचे विषयभोग करून सुख देऊ नये व त्याचा त्याग करून दुःखही देऊ नये, कारण हे शरीर वाईटही नाही व चांगलेही नाही म्हणून त्याचा हरिभजनासाठी त्वरित उपयोग करावा.’ ज्याप्रमाणे चाकू हा चांगला किंवा वाईट नाही, त्याचा ज्याप्रमाणे उपयोग होतो तसा तो चांगला किंवा वाईट ठरतो. चाकू जर एका दरोडेखोराच्या हातात असेल तर तो एखाद्याचा खून करण्यासाठी वापरतो पण तोच चाकू जर शस्त्रक्रिया करणाऱया डॉक्टरच्या हाती असेल तर तो एखाद्याचा जीव वाचवू शकतो. त्याचप्रमाणे शरीर जर आत्मस्थितीवर भगवत भक्तीमध्ये असेल तर ते मृत्यूपासून कायमचे मुक्त होण्यास मदत करते आणि तेच शरीर भगवतभक्तीमध्ये उपयोगात नाही आणले तर पुनः पुन्हा मृत्यूला कारणीभूत ठरते. यासाठी मृत्यूच्या भयापासून आपल्याला वाचवायचे असेल तर कोरोनाच्या लसीपेक्षाही महत्त्वाचे आहे ते हरिनाम. कोरोनाची लस घेऊन जरी आपण स्वतःचा जीव वाचवला आणि पुन्हा जर आपण मृत्युंजय झाल्यासारखे वागत राहिलो तरी मृत्यू अटळ आहे, तो आज ना उद्या येणारच. तत्पूर्वी शहाणे होऊन शरीराचा योग्य उपयोग करणे शहाणपणाचे ठरेल. मनुष्यशरीर प्राप्त होऊनसुद्धा जर कोणी हरिभक्तीकडे दुर्लक्ष करीत असेल तर अशा व्यक्तीला तुकाराम महाराज अभागी म्हणजे दुर्दैवी म्हणून संबोधित करताना एका हिंदी अभंगात म्हणतात बारबार काहे मरत अभागी । बहुरी मरणसे क्मया तोरे भागी ।।1।। ये हि तन करते क्मया होय । भजन भगती कर वैकुंठ जाय ।।2।। रामनाम मोल नही बेचे कबरी । वो हि सब माया छूरावत झगरी ।।3।। कहे तुका मनसु मिल राखो । रामरस जिव्हा नित चाखो ।।4।। अर्थात हे अभागी माणसा, तू सारखा मरण का स्वीकारतोस? असंख्य मरणे तू भोगलीस. तुझ्या या मानवी देहाने प्रयत्न केल्यास काय नाही होणार? हरिभक्तीने तू वैकुंठाला जाऊ शकतोस हे समजून घे. रामनामाचे चिंतन करण्यास एक कवडीसुद्धा किंमत द्यावी लागत नाही, त्यामुळेच सर्व मायेतून सुटका होते. रामाच्या ठिकाणी मन गुंतवून ठेव आणि जिव्हेने हरिनाम रसाचे आस्वादन घे. तात्पर्य एवढेच की लस घेतल्यानंतर मला मृत्यू येणार नाही या भ्रमात ना राहता मृत्यूचे खरे औषध हरिनाम, ते घ्यावे.
वृंदावनदास