प्रतिनिधी / सातारा :
सर्वसामान्य सभासदांच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी सहकार चळवळ संपूर्ण देशात रुजली. सहकारी सस्थांच्या माध्यमातून, सभासद जे सहकारी संस्थेचे खरे मालक आहेत, त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणे हे मुख्य सहकार तत्व समजले जाते. परंतु काही व्यक्तींनी संस्था सहकारी तत्वावर स्थापन केल्या, मालक सभासदांचे जीवनमान उंचावणे सोडाच पण त्यांना कामगार किंवा वेठबिगार म्हणून वागणूक देताना, हे स्वतः तथाकथित सहकार सम्राट बनले. सभासदांच्या पैशावर डामडौल आणि मौजमजा करत, डल्ला मारण्याचे महापाप अश्या लोकांकडून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात झाल्याचे निदर्शनास येत आहे. याविरुध्द आवाज उठवणाऱ्यांच्या मागे काहीतरी शुक्लकाष्ठ लावून पुन्हा आपण नामानिराळे आहोत असे दाखवले जाते. अशा लोकांचा बुरखा फाडून, भ्रष्टाचाराने बरबटलेला खरा चेहरा उघड करण्याची आता वेळ आली आहे. त्यावेळी संबंधीतांना पळताभुई थोडी होईल, असा इशारा खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिला.
याविषयी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे की, हल्ली सहकारी संस्था चालवताना, तोटय़ात दाखवायच्या, कालांतराने मोडकळीस आणून त्या सहकारी संस्था आपणच विकत घेवून, गिळंकृत करताना, खासगी करायच्या अशी एक प्रथाच महाराष्ट्रात रुढ झाली आहे. महाराष्ट्रातच नव्हे देशात काही लोकांनी आजपर्यंत हेच काम केल्याचे जाणवते. एक गलिच्छ पायंडा महाराष्ट्राच्या सहकारक्षेत्रात पडत आहे. त्याविरुध्द कोण आवाज उठवत असेल तर त्याला नाहक त्रास द्यायचा असे सुडाचे राजकारण सुरु आहे.
गेली कित्येक वर्ष समाजकारण, राजकारण करत असताना फक्त लोकांच्या विकासाचा व कामांचा विकास केला. हे करत असताना टिका, टिप्पणी होत राहिल्या याचा आम्ही कधी विचार केला नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे आम्ही शत्रू कोणालाही समजत नाही, सर्वांना मित्र समजतो. परंतु एक गोष्ट आवर्जुन सांगायची आहे की, आम्ही आजपर्यंत तत्वांशी कधीही तडजोड केली नाही आणि भविष्यात करणारही नाही. मग तो कोणीही असो., आपण समाजात वावरत असताना छत्रपतींचे आचार, विचार आचरणात आणणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्या विचारांच्या पाउलावर पाऊल ठेवून एखादा व्यक्ती कार्य करीत असेल तेव्हा संकुचित मनोवृत्तीने, विरोधासाठी विराध होत आलेला आहे. परंतु आपण जेव्हा एक बोट समोरच्याकडे दाखवत असतो तेव्हा तीन बोटे आपल्याकडे असतात हे सर्वांनी लक्षात ठेवावे, असा इशारा उदयनराजे यांनी दिला.