कोल्हापूर/प्रतिनिधी
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाटावर येवू लागले आहेत. अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनमध्ये नाराजीचा सूर आहे. कोल्हापूरात तर आमदार पी. एन. पाटील यांना मंत्रिमंडळात डावलल्याने समर्थकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
आज आमदार पी.एन.पाटील कार्यकर्त्यांनी आपली पुढील दिशा ठरविण्यासाठी फुलेवाडी नाक्याजवळील अमृत हॉलमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात काँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष शंकर पाटील, राधानगरी तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगुले, आजऱ्याचे तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर, पन्हाळ्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
करवीरचे तालुकाध्यक्ष शंकर पाटील म्हणाले की, गतवेळेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनीच पी. एन. पाटील यांना पाडले. आम्हाला कोल्हापूरच्या कोणत्या नेत्यावर नाराजी व्यक्त करायची नाही. मात्र दिल्ली व मुंबईतील नेत्यांविरोधात संघर्ष करू या. त्यांनी ४० वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ राहून काँग्रेस मजबूत केली, मात्र त्यांना मंत्रीपद न देत पक्षाने त्यांच्यावर अन्याय केलाय. पी. एन. पाटील यांच्यावर अन्याय म्हणजे आमच्यावर अन्याय आहे. त्यामुळे आम्हाला या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे सांगत त्यांनी पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.
यावेळी राधानगरी तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगुले, आजरा तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर आणि पन्हाळ्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी देखील राजीनामा दिला. या सर्वांनी आपले राजीनामे उदयसिंह पाटील–कौलवकर यांच्याकडे सुपूर्द केले.