काँग्रेस उमेदवारी आपणासच मिळणार असल्याचा दावा
प्रतिनिधी /पणजी
आमदार स्वतः मंत्री असूनही गत पाच वर्षात वेळ्ळी मतदारसंघात कोणताही विकास झालेला नाही. त्यातून मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स यांची निक्रियता उघड झाली आहे, असा आरोप वेळ्ळीचे माजी आमदार बेंजामिन सिल्वा यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने आपणास उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या स्थानिक समितीने जरी चार नावांची निवड केली असली तरी त्यात आपणच सरस दावेदार आहे. त्यामुळे उमेदवारी आपणालाच मिळाली पाहिजे, असा दावा सिल्वा यांनी केला आहे.
वेळ्ळीला आदर्श मतदारसंघ बनविण्याचे आपले स्वप्न होते. त्याद्वारे पाच वर्षात वीज, पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आपण यशस्वी ठरलो. मात्र नंतर 2017 च्या निवडणुकीत काही मतांच्या फरकाने आपला पराभव झाला व फिलीप रॉड्रिग्स यांची निवड झाली. परंतु विकासाच्या दृष्टीने मतदारसंघ मागेच राहिला. मंत्रीपदी फिलीप रॉड्रिग्स मतदारसंघाच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत, असे सिल्वा म्हणाले. त्यामुळे या निवडणुकीत संधी मिळाल्यास अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे आपले प्रयत्न असतील, असे ते म्हणाले.
सध्या आम आदमी, तृणमूल यासारखे अनेक नवे पक्ष राज्यात दाखल झाले आहेत. त्यांनी अनेकांना स्वतःकडे खेचण्यासाठी नवनवीन आमिषे, आश्वासने देण्यास प्रारंभ केला आहे. या पक्षांचे काही नेते आपणालाही भेटले होते. मात्र त्यांची कार्यपद्धती पाहिल्यास कुणाच्याही लक्षात येईल ते म्हणजे दोन्ही पक्ष भाजपच्या कोणत्याही नेत्याकडे संपर्क करत नाहीत. त्यांचे लक्ष्य केवळ काँग्रेस आमदार आहेत. त्यामुळे आपण नकार दिला. तसेच आपण कधीच भाजपमध्ये प्रवेश केला नाही. आमदार असतान मतदारसंघातील कामे करून घेण्यासाठी केवळ समर्थन दिले होते, असे सिल्वा यांनी स्पष्ट केले. आपण काँग्रेस सेवादलचा कार्यकर्ता होतो. त्याच आधारावर आपण काँग्रेस उमेदवारीसाठी दावा करत असून पक्ष निश्चितच आपणास उमेदवारी देईल, असा विश्वास असल्याचे सिल्वा यांनी सांगितले.