वाहिन्यांवरील वृत्ताने संभ्रम कायम, वृत्त चुकीचे : संजय राऊत, अरुण राठोडच्या घरी चोरीमुळे खळबळ
प्रतिनिधी / पुणे, मुंबई
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने वातावरण तापलेले असताना मंगळवारी दिवसभर वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने राज्यात खळबळ उडाली. वृत्त वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले होते. तर सायंकाळी शिवसेनेने बैठक बोलावल्याने राजकीय घडामोडींना वेग आल्याचेही दिसून आले. तथापि शिवसेनेकडून राजीनाम्याबाबत अधिकृत दुजोरा न दिल्याने अधिकच गुढ वाढले. त्यांच्यावर सेनेतीलच एका गटाकडून राजीनाम्याकरता दबाव निर्माण केला जात असल्याचीही चर्चा आहे.
दिवसभरातील चर्चेची ही कोंडी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी फोडली. राठोड यांच्या राजीनाम्याचे वृत्त चुकीचे असून त्यांनी राजीनामा दिले नसल्याचे स्पष्ट करत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर शिवसेनेत कोणतेही गटतट पडले नसल्याचेही सांगितले. दुसरीकडे शिवसेनेच्या विविध नेत्यांनी कठोर प्रतिक्रिया देत भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.
अहवाल महासंचालकांना सादर
या प्रकरणाचा सखोल अहवाल पोलीस तयार करत आहेत. अहवालात त्रुटी राहू नये, आणि पोलीस संशयाचे बळी ठरु नयेत, यादृष्टीने कामकाज सुरु आहे. अहवालामध्ये पुजाचे सर्व कॉल रेकॉर्डस, फॉरेन्सिक अहवाल, संबंधित व्यक्तींचे कनेक्शन, बँक डिटेल्स तसेच पासपोर्टबाबत माहिती घेऊन सदर अहवाल तयार केला आहे. दरम्यान, हा अहवाल पुणे पोलिसांनी राष्ट्रीय महिला आयोग व पोलीस महासंचालकांकडे पाठविल्याचे समजते.
संजय राठोड यांच्यावरुन दोन गट ?
शिवसेनेत राठोड यांच्यावरुन दोन गट पडल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे गटाचे असलेल्या राठोड यांच्या विरोधात खासदार भावना गवळी आणि यवतमाळमधील बाजोरिया, देशमुख आदी नेते आहेत. त्यांच्याकडून राजीनाम्यासाठी दबाव निर्माण केला जात असला तरीही प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच राठोड यांना काही सूचना, आदेश दिले आहेत. राजीनामा दिल्यास आरोप मान्य केल्यासारखे होईल, असे दुसऱया गटाचे म्हणणे आहे. परंतु संजय राऊत यांनी मात्र गटतट नसल्याचे स्पष्ट केले आहे. चौकशीही सुरु असल्याने त्यावर बोलणे योग्य नसल्याचेही राऊत यांनी सांगितले.
भाजप नेत्यांची असली प्रकरणे सांगता येतील : वडेट्टीवार
संजय राठोड यांचा राजीनामा मीडिया ट्रायलचा परिणाम असल्याची टिका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. महिलांबाबत भाजप नेत्यांची डझनावरी प्रकरणे मला सांगता येतील. पण, त्यांना नैतिकता लागू होत नाही. तिथे नैतिकता संपुष्टात येते, असा टोला वडेट्टीवार यांनी मारला.
चौकशी सुरु असेपर्यंत बोलणं उचित नाही : गुलाबराव पाटील
जळगाव : संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची माहिती मला माध्यमातूनच मिळाली आहे. चौकशीत ते दोषी आढळले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईलच मात्र तोपर्यंत अधिक बोलणं उचित होणार नाही, अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
१८ रोजी पोहरादेवी गडावर सोडणार मौन
संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत आणि ठावठिकाण्याबाबत खमंग चर्चा सुरु असतानाच ते १८ फेब्रुवारीला मौन सोडतील, अशी अपेक्षा बंजारा समाजाचे गुरु सुनील महाराज यांनी दिली. बंजारा समाजाची काशी मानल्या जाणाऱ्या पोहरादेवी गडावर संजय राठोड येणार आहेत. तिथे ते याविषयी आपली बाजू मांडतील असा दावाही, गुरू सुनील महाराज यांनी केला आहे.