इराण्णा सिंहासने/इचलकरंजी
कोरोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व कारखाने बंद आहेत. यामुळे हातावरचे पोट असलेल्या कामगारवर्गाची अवस्था बिकट झाली आहे. पण अशाही परिस्थितीत अनेकांनी भाजीपाला विक्रीचा पर्याय शोधून रोजगाराची नवी संधी आत्मसात करत बेरोजगारीवर मात करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत.
इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असल्याने येथे रोजगाराच्या निमित्ताने देशाच्या सर्व प्रंतातील लोक स्थायिक झाले आहेत. त्यामुळे या शहराला कामगार वस्तीचे शहर म्हणूनही ओळखले जाते. येथील वस्त्रोद्योगात यंत्रमागासह सायझिंग, प्रेसेस, निटींग, गारमेंट यासह एअरजेट, शटललेस, रॅपियर अशा अत्याधुनिक मशिनरीवरती काम करणाऱ्या कामगारांचीही संख्या मोठी आहे. या व्यवसायावरच शहरातील सर्वच घटक विसंबून आहेत.
सध्या जगभरातील लोकांना कोरोना व्हायरसचा सामना करावा लागत आहे. यातून सहीसलामत बाहेर पडायचे असेल तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. हे सत्य समजल्यानंतर भारतासह सर्वच देशांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय किती कालावधीसाठी असणार आहे, हे मात्र अद्याप अनिश्चित असून लॉकडाऊन कालावधी वाढतच चालला आहे. हा वाढता कालावधी मात्र ज्या कामगारांचे हातावरचे पोट आहे, अशांसाठी हलाखीचा ठरत आहे. यावर उपाय म्हणून शहरातील काही मंडळींनी नव्याने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय पत्करला आहे.
खरे तर, हा व्यवसाय या नवागतांसाठी पारंपरिक नसला, तरी कुटुंबाचा दैनंदिन चरितार्थ चालविण्यासाठी खूपच उपयुक्त ठरू लागला आहे. विशेष म्हणजे, ही सर्व नवी मंडळी सकाळी ६ ते १० या वेळेत डोक्यावर भाजीची टोपली किंवा ढकलगाडा घेऊन गल्लोगल्ली फिरून अण्णा, दादा, काका, मावशी, वहीनी, ताई अशी आरोळी ठोकत भाजीपाला खपविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. विक्री केलेल्या मालातून नफ्याचे दोन पैसे कमी मिळाले तरी चालेल, परंतु केलेल्या कष्टाचं चीज होते, हे लक्षात आल्यानंतर या मंडळींच्या चेहेऱ्यावर उमटणारा आनंद इतरांसाठी वेगळाच अनुभव देणारा ठरू लागला आहे. एकंदरीत लॉकडाऊनमध्ये वाढत जाणारी बेरोजगारी हा विषय मोठ्या प्रमाणात समोर येत असला तरी काही जणांनी या मंदीतही संधी शोधण्याचा केलेला प्रयत्न खरोखरच उल्लेखनीय म्हणावा लागेल.