करमाळा प्रतिनिधी
विना परवाना ऊसाचे गाळप केल्याप्रकरणी मकाई सह साखर कारखान्यास साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पाच कोटी 63 लाख, दोन हजार पाचशे रूपयाचा दंड केला असून दंडाची रक्कम 15 दिवसाच्या आत भरण्यास सांगितली असल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
महाराष्ट्र राज्य साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण व गाळप आणि ऊस वितरण नियमन) आदेश, 1984 खंड 4 मधील तरतुदीनुसार कारखान्यावर विनापरवाना ऊस गाळप केले म्हणून दंडात्मक कारवाई करण्यापुर्वी सदर आदेशातील खंड 5 नुसार म्हणणे मांडण्याची संधी मकाईला 11 जानेवारी 22 रोजी दिली होती. कारखान्याचे वतीने सुनावणीकरीता फायनांस मॅनेजर विजय काळे, हे उपस्थित होते. सदर प्रकरणी दाखल केलेला युक्तीवाद, कागदपत्रे, संदर्भीय निकालपत्रे व कायदेशीर तरतुद यांचा अभ्यास करून मकाई सहकारी साखर या कारखान्याने गाळप हंगाम 2021-22 विना परवाना दि.15 नोव्हेंबर 2022 पासून ते दि. 10 जानेवारी 2022 पर्यंत 1,12,605 टन ऊसाचे विना परवाना गाळप केलेले आहे हे सिध्द झाले. त्यानुसार आयुक्त शेखर गायकवाड यांनी 1,12,605 टन ऊसाचे विना परवाना गाळप केलेल्या ऊस गाळपावर रु.500/- प्रति टन प्रमाणे ₹.5,63,02,500 (अक्षरी पाच कोटी त्रेसष्ट लाख दोन हजार पाचशे फक्त) एवढ्या रक्कमेचा दंड आकारला आहे. सदर दंडाची रक्कम मकाई सहकारी साखर कारखान्याने आदेश प्राप्त झाल्यापासून 15 दिवसाचे आत शासकीय कोषागारात भरणा करावी असा आदेश काढला आहे. या आदेशाने खळबळ उडाली आहे.