प्रतिनिधी / पंढरपूर
एकादशीला विठूरायाच्या पंढरीत आलेल्या दोन वारकरी महाराजांमधे मठाधिपती होण्याचा वाद झाला आणि यातून ह.भ.प. जयवंतबुवा पिसाळ यांचा खून झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर येथील अनिल नगर परिसरात असलेल्या कराडकर मठात सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील रहिवासी जयवंतबुवा पिसाळ आणि बाजीरावबुवा कराडकर यांच्या मध्ये मठाधिपती होण्यावरुन वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणांमध्ये झाले आणि यातूनच बाजीरावबुवा कराडकर यांनी जयवंतबुवा पिसाळ यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
यामध्ये जयवंतबुवा पिसाळ हे कराडकर मठाचे विद्यमान मठाधिपती आहेत. तर बाजीरावबुवा कराडकर हे या मठाचे माजी मठाधिपती आहे. सदरचा मठ हा ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.