आसाम रायफल्सचे 5 जवान हुतात्मा – कमांडिंग ऑफिसरच्या पत्नी-मुलाचाही मृत्यू
इंफाळ / वृत्तसंस्था
मणिपूरमध्ये म्यानमार सीमेवर शनिवारी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरसह 5 जवान हुतात्मा झाले आहेत. त्याच हल्ल्यात आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांच्या पत्नी अनुजा शुक्ला (वय 37) आणि मुलगा आशिष त्रिपाठी (वय 5) यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. चुराचंदपूर जिह्यातील सिंघट येथे ही घटना घडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे.
मणिपूरमध्ये आयईडी स्फोटके लावून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात कर्नल विप्लव त्रिपाठी (सीओ-46 एआर) यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर, या हल्ल्यातील अन्य जखमींना बेहियांग प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. सुरक्षा दलाच्या ताफ्याला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले असल्याचे म्हटले जात आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ताफ्यात लष्करी अधिकाऱयांचे कुटुंबीयदेखील होते. त्यांच्या पत्नीचे नाव अनुजा असे असून मुलाचे नाव अबीर असल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली.
भ्याड हल्ल्याचा निषेध
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या हल्ल्यावर शोक व्यक्त करताना हे भ्याड कृत्य असल्याचे म्हटले आहे. यासोबतच या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचेही सांगण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांनी हा भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्याचा निषेध करताना त्यांनी हल्ल्यातील दोषींवर कारवाई करण्यात येईल. पॅरामिलिटरी आणि राज्य सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले.
कर्नल त्रिपाठी हे मूळचे छत्तीसगडमधील
आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल त्रिपाठी हे मूळचे छत्तीसगडमधील रायगड जिल्हय़ातील आहेत. त्यांचा जन्म 1980 मध्ये झाला. रीवा येथील सैनिक स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. आसाम रायफल्समधील लेफ्टनंट कमांडंट त्रिपाठी यांनी संरक्षण अभ्यासात एम.एस्सी. केल्यावर त्यांना प्रमोशन मिळाले होते. कर्नल त्रिपाठी यांनी छत्तीसगडमधील रायगड येथे आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांच्या धाकटय़ा भावाचे नाव अनिल त्रिपाठी असे असून ते सैन्यात लेफ्टनंट कर्नल आहेत. त्यांचे आजोबा डॉ. किशोरी मोहन त्रिपाठी हे स्वातंत्र्यसैनिक होते.
यापूर्वी 5 नोव्हेंबरला श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्ससमोर दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर हल्ला केला होता. नागरिकांच्या उपस्थितीचा फायदा घेत दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. दहशतवादी संघटना गाझी स्क्वॉडने बेमिना येथे सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.