मणेरीतील सात कुटुंबांना गेल्यावर्षी बसला होता फटका : यंदाही भीती कायम : तिलारीचे पाणी सोडताना हवी पूर्वकल्पना
तेजस देसाई / दोडामार्ग:
काही घटनांचा तडाखा एवढा भयंकर असतो की घटना आठवली तरी अंगावर शहारे येतात. ही घटना दुश्मनाच्या घरातही घडू नये असे वाटते. गेल्यावर्षीच्या पूरस्थितीचा दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला आणि यावर्षी वेधशाळेने चक्रीवादळाचा इशारा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावधगिरीचे केलेले आवाहन यामुळे दोडामार्ग तालुक्यातील पूरबाधीत गावात भीतीदायक वातावरण आहे. मणेरी येथील खालचा बाजारवाडी येथील सात कुटुंबाची अशीच अवस्था झाली. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधताना त्यांच्या शब्दाशब्दात गवतर्षीच्या पूरजन्य परिस्थितीची भीती ठळक व गडद दिसत होती.
दोडामार्ग तालुक्यात गतवर्षीच्या पावसाळय़ात तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. दुथडीभरून आपले पात्र ओलांडून वाहणाऱया नदीचे पाणी कोणाच्या घरात तर काहींच्या बागायती घेऊन वाहत होते. कधी नव्हे एवढय़ा विस्तारलेल्या नदीला तिलारी धरणाचे सोडण्यात येणाऱया अतिरिक्त पाण्याचे नियोजन नसल्याचे अनेक ग्रामस्थांनी बोलून दाखविले. त्यानंतर धरण प्रशासनाने ‘दवंडी’ देण्याचे काम केले. मात्र, पाऊस ओसरल्यावर नदीपात्रातील गाळ काढणे असो वा पूरजन्य रेषा, आपत्कालीन यंत्रणा याचा पावसाळय़ात थांगपत्ता नाही. पाऊस सुरू होण्याअगोदर दोन दिवस एका ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू केले. तेही अर्धवट स्थितीला ठेवले. त्यामुळे यावर्षीची परिस्थितीही ‘संकट येईल तेव्हा बघू’ अशीच दिसत आहे.
मणेरीत पाऊस पडल्यावर
रात्र काढावी लागते जागून
गतवर्षी पूरपरिस्थितीचा प्रचंड तडाखा बसलेल्या मणेरी खालची बाजारवाडी येथे ग्रामस्थांनी प्रत्यक्ष संवाद साधला. येथील सात घरांना मणेरी नदीच्या पाण्याने वेढले होते. ग्रामस्थांच्या माहितीनुसार 35 वर्षांपूर्वीचा अपवाद वगळता अशी स्थिती आली नव्हती. गतवर्षीच्या पावसाने नदीचे पात्र विस्तारले. यावर्षी पात्र कोसळत गावाच्या दिशेने येत आहे. तिलारी धरणाचे गतवर्षीप्रमाणे पाणी सोडल्यास पात्र गावाच्या दिशेने विस्तारणार आहे. गेल्यावर्षी नदीमार्गे असणारी वीजवाहिनी रस्तामार्गे आणावी, अशी मागणी केली. ती पूर्ण झाली नाही. परिणामी रात्रीच्यावेळी वाडीत बत्ती गूल असते. त्यामुळे पाऊस वाढल्यावर पाण्याचा अंदाज घेण्यासाठी जाताना भीतीचे काहूर माजते. ज्यावेळी तिलारी धरणाचे पाणी सोडण्यात येईल, त्यावेळी केवळ सूचना देणे काम नाही तर गतवर्षीच्या पूरबाधीत गावात आपत्कालीन यंत्रणा असायला हवी. ग्रामस्थ राजेंद्र वस्त, शांताराम बांदेकर, सूरज प्रसादी, मधुकर बांदोडकर, सतीश पावसकर, भगवान गवस आदी उपस्थित होते. त्यांनी गतवर्षी सेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, युवा सेना उपतालुकाप्रमुख भगवान गवस, सरपंच विशांत तळवडेकर व त्यांच्या टीमने धोक्यात घालून आपल्या वाडीतील माणसांचे स्थलांतर केले. यावर्षी शासनाने खबरदारी बाळगावी, असे आवाहन केले.
नियोजन हवे!
गतवर्षी तालुक्यात पूरस्थितीने प्रचंड नुकसान झाले. अनेकांना स्थलांतरित करावे लागले. बोटी, एन. डी. आर. एफ. ची टीम पाचारण करावी लागली. अनेक ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून आपल्या बंधू-भगिनींना वाचवले. त्यानंतर तालुक्यात आपत्कालीन यंत्रणा उभारा, अशी मागणी करण्यात आली. ‘हो, करू’ असा सूरही प्रशासनाने लावला. मात्र, यावर्षीही तूर्ततरी गंभीर स्थिती आहे. पाऊस जोरदार सुरू असताना मदतीसाठी संपर्क कोणाकडे करायचा, यासाठी प्रशासनाने जबाबदार अधिकारी नियुक्ती करून संपर्क क्रमांक (नेटवर्कमध्ये असणारा) पूरबाधीत गावात देणे आवश्यक आहे. गतवर्षी पहिलीच वेळ होती व ती ‘ठेच’ होती हे लक्षात घ्यायला हवे.