भोपाळ / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशात एकाच वेळी 39 जणांना प्रत्येकी 7 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्व आरोपींवर पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप होता. ही घटना 8 वर्षांपूर्वी घडली होती. 30 आणि 31 जुलै 2014 या कालावधीत इंदूर या शहरात संचारबंदी लागू असताना या आरोपींनी कामावर असलेल्या पोलिसांवर हल्ला केला होता. त्यात 15 पोलीस जखमी झाले होते.
इंदूरच्या घासपुरा मोहल्ल्यातील पोलीसस्थानक क्षेत्रात ही घटना घडली होती. संचारबंदी काळात या मोहल्ल्यातील अनेक लोक मध्यरात्री संचारबंदी आदेश मोडून त्यांच्या घराबाहेर जमले होते. गस्त घालणाऱया पोलिसांनी त्यांना घरात जाण्यास सांगितले. पण त्यांनी पोलिसांवर काठय़ा, चेन्स आणि कुऱहाडींनी हल्ला चढविला होता. तसेच अनेक पोलीस गाडय़ांवर दगडफेक केली होती. पोलिसांनी नंतर 46 जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर खुनी हल्ला चढविण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणाचा निर्णय बुधवारी देण्यात आला आहे.
या प्रकरणात 33 जणांची साक्षी नोंदल्या गेल्या. पोलिसांनी भक्कम पुरावे सादर केल्याने 39 आरोपींना 7 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली. आरोपींनी संचारबंदीचा भंग करुन पोलिसांवर हल्ला केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने त्यांना ही शिक्षा देण्यात आली. एकाच वेळी 39 जणांना 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली जाणे, अशी घटना प्रथमच असावी, असे अनुमान आहे.