प्रतिनिधी/ बेळगाव
लेंडी नाल्याचे रुंदीकरण करुन पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने वारंवार करण्यात आली होती. त्याची दखल महापालिका आयुक्तांनी घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेकडील नाला साफ केला. त्यानंतर शुक्रवारी उत्तरेकडील नाल्याच्या खोदाईला सुरुवात करण्यात आली. या नाल्यामध्ये झालेले अतिक्रमण हटविण्यात आले. महापालिका आयुक्त जगदीश तब्बल दीड तास पावसामध्ये उभे राहून नाल्याच्या खोदाईची पाहणी करत थांबले होते. याबद्दल शेतकऱयांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
लेंडी नाल्यामुळे शहराला महापूर येत होता. याचबरोबर शेतकऱयांच्या जमिनीत पाणी शिरुन पिकांचे मोठे नुकसान होत होते. दरवषी शेतकऱयांना मोठा त्रास सहन करावा लागला. शहराचे संपूर्ण पाणी या लेंडी नाल्यातून पुढे जात असते. हे पाणी बळ्ळारी नाल्याला पोहोचते. त्यामुळे या नाल्याची खोदाई करणे महत्त्वाचे आहे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांच्यासह सुनील जाधव व इतर शेतकऱयांनी केली होती.
त्यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिका आयुक्त जगदीश यांनी या नाल्याची खोदाई करण्याचे ठरविले. पूर्वेकडच्या नाल्याची खोदाई पूर्ण केली. त्यानंतर आता पश्चिमेचा नाला खोदाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र हा नाला जवळपास 3 कि.मी. असल्याने त्याची पूर्णपणे खोदाई होणे गरजेचे आहे. आता काही प्रमाणात नाल्याची खोदाई झाली आहे. तेव्हा पूर्ण खोदाई करावी आणि पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे. शुक्रवारी राष्ट्रीय महामार्गाशेजारी असलेल्या पुलाजवळची माती काढण्यात आली आहे. मात्र अजूनही त्यामध्ये गाळ असून तो काढणे गरजेचे आहे.
महापालिका आयुक्तांनी याबद्दल जी काळजी घेतली आहे, त्याबद्दल शेतकऱयांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी संघटना या नाल्याच्या खोदाईसाठी प्रयत्न करत होती. मात्र महापालिकेकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र सध्याचे आयुक्त जगदीश यांनी या नाल्याची पूर्णपणे खोदाई करु, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शेतकऱयांतून समाधान व्यक्त होत आहे.