‘हेमा, हल्ली केवढी चिडचिड करतेस गं. परवापासून पाहते आहे. काय बिनसतंय सारखं तुझं.. याच्यावर राग-त्याच्यावर राग. याने हे केले नाही. त्याने ते केले नाही. सतत धूसफुस बरी नाही. मी ज्या हेमाला ओळखते ती अशी नव्हतीच. हे तुझे रूप काही वेगळेच आहे. काही प्रॉब्लेम आहे का?’
ख‘मीना मावशी बरोबर आहे तुझं. आई हल्ली अशीच करते. सर्वांना मदत वगैरे करते. पण कुणाला मदत केली आणि त्याने हिची आठवण नाही काढली की चिडते. परवाचाच किस्सा सांगू का आई राघवचा? आईने कधीतरी त्याला मदत केली होती. त्या दिवशी हा समोरून गेला तरी हाक मारली नाही म्हणून दिवसभर वैतागलेली होती. त्याने कदाचित पाहिलेही नसेल ना..असे होऊ शकते. पण ही उगीचच त्रागा करत राहिली. कधी अशी बारिक सारिक कारणे, तर कधी कामवालीच्या हातून काही फुटले, कुणाच्या हातून काही हरवले तर त्रागा, छोटेसे भांडण झाले तरी हल्ली मूड जातो तिचा. आताही चिडेल माझ्यावर.. मी हे बोलते आहे म्हणून.. पण मला सांग मावशी अशी सारखी चिडचिड हिच्या तब्बेतीसाठी चांगली आहे का?’
मीना-‘अजिबातच नाही. हेमा. काय गं.. ही म्हणतेय ते खरं आहे का?’ ‘हेमा-हो. हल्ली फार होतंय असं. कामाच्या धावपळीमुळे असेल कदाचित. ‘मीना-हे बघ, किती तरी वेळा तुला सांगितलं स्वस्थ बसावं, स्वतःसाठी थोडा वेळ काढावा. पण नाहीच..’ ‘हेमा-बसते की स्वस्थ..’ ‘वेदा-हो. अगदी. पेपर वाचत नाहीतर टीव्ही बघत..मावशी तू म्हणतेस तशी स्वस्थ ती कधीच बसत नाही.’
‘वेदा..तू जातेस का आता…आम्ही बोलतो आहोत ना..जा अभ्यासाला..’
दोन मैत्रिणींमधला हा संवाद बराच काळ सुरू होता. हेमासारख्या अनेक व्यक्ती आपल्याला येता जाता भेटत असतात. खरेतर, बुद्धीच्या देणगीचा उपयोग करून माणसाने अनेक सुखसोयी निर्माण केल्या, अनेक गोष्टींमधे प्रगती केली. परंतु स्वतःच उभ्या केलेल्या या जीवनपद्धतीत, समाजव्यवस्थेमधे तो इतका ताणतणावांच्या ओझ्याखाली का बरं दडपून गेला आहे ताणतणाव, चिडचिड हे टाळता येण्यासारखे नाही का? आपण कसे जगतो, कसे वागतो, कसा विचार करतो या सगळय़ा गोष्टी स्वतःच प्रामाणिकपणे तपासल्या तर आपले आपल्यालाच उत्तर मिळेल.
लहान लहान गोष्टींमध्ये आपण आपले वागणे विचारपूर्वक बदलले तर जास्त शांत, प्रसन्न, कमी तणाव असलेले आयुष्य आपण जगू शकू का? नक्कीच जगू शकतो.
वरील उदाहरणातील हेमासारख्या काही व्यक्ती अशा असतात की एखाद्याला मदत केल्यानंतर त्याने ते लक्षात ठेवायलाच हवे अशी अपेक्षा ठेवतात आणि समोरच्याने तसे नाही केले तर दुखावले जातात, अस्वस्थ होतात. परंतु एक लक्षात घ्यायला हवे की मदत करण्याचा मार्ग आपण निवडलेला असतो. मग अपेक्षा कशासाठी? ती मदत जर गवगवा न करता केली, आपला अहंगंड न पोसता केली तर त्यातून मिळणारा आनंद वेगळा असतो. जर दुसऱयाने आपल्याला मोठे म्हणायला हवे, लक्षात ठेवायलाच हवे हा आग्रह आपण धरत बसलो तर अस्वस्थता येण्यापलीकडे फार काही साध्य होणार नाही. काहीवेळा दुसऱयांकडून अपेक्षा ठेवल्याने आपण दुखावले जातो तर कधी कुणासोबत आपले छोटे मोठे खटके उडत असतात. अर्थात केव्हा ना केव्हातरी असे होणारच परंतु आज झालेल्या छोटय़ाशा भांडणाचे, राग रुसव्याचे आपल्याला जेवढे महत्त्व वाटते, तेवढे खरेच आहे का? थोडा विचार केला तर लक्षात येईल की आणखी काही महिन्यांनी ते आपल्यालाही हास्यास्पद वाटेल. म्हणून लहानसहान भांडणे, एखादी वस्तू एखाद्याच्या हातून फुटणे, हरवणे या गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊन ती गोष्ट फार वाढवत नेऊ नये. थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, फारच कमी गोष्टी दुर्लक्ष न करण्याइतक्मया महत्त्वाच्या असतात. परंतु हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला काही वेळ खरेच स्वस्थ बसावे लागेल. काहीही न करता.
काहीही न करता बसायचे म्हणजे काय? आपल्यापैकी बरेच जण म्हणतील वाचन, संगीत ऐकत किंवा टीव्ही पहात स्वस्थ बसायचे, वरील उदाहरणातील हेमासारखे..!! परंतु याबाबत एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण हल्ली स्वस्थ बसणे विसरत चाललो आहोत. आपण सतत काही ना काहीतरी करतच रहायला हवे, स्वतःला व्यग्र ठेवायला हवे, शरीर, मनाला सतत कशात तरी गुंतवून ठेवायलाच हवे, कायम कसे बिझी राहिलेले बरे असे आज अनेकांना वाटते. आपण कसे वागतो याकडे जरा पाहुया..
पहा हं, आपण बाहेरून घरात आलो की थोडे प्रेश झाल्यावर हॉलमधे बसतो.. चहा घेत टीव्ही ऑन करतो. कुणी हातासरशी घरातला पसारा आवरायला सुरुवात करतात, कुणी वर्तमानपत्र चाळतात, कुणी कुणाला फोन करतात तर कुणी मोबाईलवर काय काय येऊन पडलंय पाहू जरा म्हणून मोबाईलमधे डोकं घालून बसतात. आता तर वेळ मिळाला आहे आणि या सगळय़ा गोष्टींमुळे आपण स्वतःला रिलॅक्स करत आहोत असे आपल्याला वाटत असते परंतु यातून आपल्या मनाला विश्रांती मिळत नसते.
पूर्वीच्या काळात डोकावून पाहिले तर शतपावली उरकून शांतपणे लोडाला टेकून बसलेले आजोबा, कामधाम उरकून शांतपणे बसलेली आजी किंवा झोपाळय़ावर शांत बसलेले बाबा आठवतात का? त्यांच्या मनाला स्थिरावायला दिवसातून दोन तीन वेळा तरी सवड मिळत होती. अर्थात तशा लयीच्या आयुष्यात जाणे शक्मय नाही हे मलाही ठाऊक आहे. परंतु तरीही टी.व्ही., मोबाईल या साधनांचा भुंगा मागे न लावता वा सतत काहीतरी करतच राहिले पाहिजे म्हणून व्यस्त न राहता आपल्या मनाला-शरीराला दिवसातून पंधरा मिनिटे तरी मोकळे सोडायला हवे. असे केल्याने तुम्ही जे काम करत आहात ते अधिक चांगल्या रीतीने करण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होतो. दिवसाकाठी पंधरा मिनिटे शांत बसायचे आणि श्वासावरती लक्ष नेऊन आपल्या मनात काय चालले आहे याकडे लक्ष द्यायचे. मनात येणारे विचार, भावना आपण न्याहाळू शकतो आणि ते आवश्यकही आहे कारण आपले मन एकाच वेळी अनेक पातळय़ांवर विचार करत असते. आपण असतो वर्तमानात पण मन भूतकाळात, भविष्यकाळात भटकत असते, वर्तमानकाळात कशाबद्दल तरी चुकचुकत असते. होऊ शकणाऱया, न होऊ शकणाऱया अनेक गोष्टी आपल्या मनात घोळत असतात.
आपण असतो वर्तमानात पण आपले मन कुठेही भटकत असते. कधी घडून गेलेल्या सुखद आठवणींमधे रमते, कधी गमावलेल्या गोष्टींमध्ये तर कधी भविष्यकाळाची स्वप्ने पाहण्यामधे गुंग होते. अर्थात यात वावगे काही नाही. परंतु आपण सतत त्यातच रमू लागलो तर मात्र अवघड होईल. घडून गेलेल्या दुःखद घटना आठवायची सवय लागली तर ती मानसिक अस्वास्थ्याची नांदी ठरेल तसेच सतत पुढे कसे होणार याची काळजी चिंतेत बदलली तर उमेद नाहीशी होईल आणि छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा आनंद घेता येणार नाही. खरेतर आपण जे काम करतो आहोत त्यावर नीट लक्ष देण्यासाठी आपण आपल्या मनाला वळण लावू शकलो, तर कामाचा दर्जा सुधारेलच आणि काम जास्त चांगले झाल्याचे समाधानही मिळेल. अर्थात याविषयी अधिक जाणून घेऊया पुढील लेखात.
ऍड. सुमेधा देसाई, मो.94226 11583