प्रतिनिधी/ सातारा
मनोरंजन अत्यावश्यक गोष्ट आहे. पण ती ज्ञानाधिष्टीत झाली तर अधिक चांगली आहे. नाटकं आणि त्यावेळच्या चित्रपटांनी प्रेक्षकवर्ग घडला. काळानुरुप बदल होत जावून एका चौकटीत मनोरंजन येवून थांबले नाही तर त्याही पुढे निघाले आहे. फुकट झाले आहेत. मनोरंजन हे व्यक्त होण्याचे साधन आहे, असे प्रखर मत सिनेकलाकार योगेश सोमण यांनी व्यक्त केले.
साताऱयाच्या श्री. छ. प्रतापसिंह नगरवाचनालयात माध्यम संवाद परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार गोपाळ जोशी, सामाजिक कार्यकर्ते विजय जोशी, नगरवाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर, डॉ. सुभाष दर्भे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना योगेश सोमण म्हणाले, दि.21 फेब्रुवारीला मातृभाषा दिनापासून ते वि. वा. शिरवाडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने होत असलेला मराठी भाषा दिन हा सारस्वतांसाठी हे उत्सवाचे दिवस आहेत. त्यामध्ये माझ्यासारख्याला मनोरंजन काल आज आणि उद्या या विषयावर बोलण्याची संधी दिली. मनोरंजन ही अत्यावश्यक गोष्ट आहे. ती ज्ञानधिष्ठीत झाली तर अधिक चांगली आहे. माझ्यासाठी सातारा हे मनोरंजन व्यासपीठ नाही तर अंगण आहे. आपण पहातो पूर्वी नाटय स्पर्धा व्हायच्या. त्यामधून प्रेक्षक समूह घडत गेले. ती समांतर रंगभूमी असे. त्यातून पिढय़ानपिढय़ा घडवल्या गेल्या. काळानुसार छोटय़ा चौकटीत बंदिस्त होवून मनोरंजन फुकट झाली अन् कलेला ओहोटी लागली असे म्हणावे लागेल. एकाच कथानकाच्या मालिका प्रेक्षक बघत राहिला. पूर्वी नाटक आणि चित्रपट उठून बघावे लागायचे, वेळ द्यावा लागायचा. पहिली घंटा ऐकायला लागायची. करमणूक साधनांची वेळ दिलेला असायचा. ललित कलांमध्ये सुद्धा योगदान असायचं. आता एडीट बॉक्समुळे सारं काही घरबसल्या मिळते. एकाच धाटणीच्या मालिका सुरु असतात. मी हा दोष प्रेक्षकांना देतो कलाकारांना नाही, जेवढे जितेंद्रने सिनेमात कमवल नाही तेवढे एकता कपूरने मालिकांमध्ये कमवले ती स्वतः म्हणते की मी बिनडोक गृहिणींसाठी मालिका बनवते. मला मालिकांना वाईट म्हणायचे नाही. पूर्वी दूरदर्शनवर मालिका होत होत्या. त्यांचा आदी, मध्य आणि अंत ठरलेला असल्याचा. आता अनेक त्रुटी आहेत. मराठी चित्रपटांना उतरती कळा लागलेली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे डब्ंिांग आक्रमण झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
गोपाळ जोशी म्हणाले, माध्यमे अतिशय वेगाने बदलत आहेत. काही वर्षापूर्वी पेजर तंत्रज्ञान विकसीत झाले होते. ते येईपर्यंत मोबाईल आला. पत्रकार म्हणजे माध्यम समजल जायचे. ते आता राहिलेले नाही. नेहमी म्हणले जाते, वाचन कमी झाले, सोशल मीडियावर वाचन होते. वाचनाचे माध्यम बदलले आहे. माध्यमांचे चांगले संदर्भ असणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
नगरवाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर यांनी स्वागत केले. वैदेही कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले तर ऍड. सिमंतीनी नुलकर यांनी परिचय करुन दिला. डॉ.राजेंद्र माने यांनी मत व्यक्त केले. यावेळी 16 पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.