पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गेले दोन दिवस मुंबई दौऱयावर आहेत. ‘जय बांगला जय मराठा’ असा नारा देत त्यांनी मुंबईत काही उद्योगपती, गुंतवणुकदार आणि राजकीय नेते यांच्या भेटी-गाठी सुरु केल्या आहेत. पण प्रमुख हेतू तृणमूल काँग्रेसचा विस्तार आणि भाजपा विरोधी आघाडीचे नेतृत्व हा आहे. पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका मुंबई महापालिका निवडणूक आणि 2024 ची लोकसभा निवडणूक अशी सारी सत्तासंघर्षाची मैदाने समोर आहेत. भाजपा विरोधी आघाडीचे नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार यांना करायचे आहे. प्रशांत किशोर यांचा सल्ला घेऊन त्यांनी त्यासाठी रान तापवायला सुरुवात केली आहे. पण पवारांना कितपत पाठिंबा मिळणार हा प्रश्न आहे. पवारांची निष्ठा सातत्याने सत्तेवर आहे. सर्व राजकीय पक्षांशी व नेत्यांशी त्यांचे संबंध आहेत. पवारांच्या काँग्रेसला फार मोठे यश आलेले नाही. पण त्यांनी या ना त्यामार्गे सतत सत्ता राखली आहे आणि आता त्यांना पंतप्रधान, राष्ट्रपती असे देशातील अव्वलपद हवे आहे. ममता बॅनर्जी या लढाऊ व यशस्वी महिला आहेत. त्यांचा ‘खेला’ नरेंद्र मोदींना भाजपाला पश्चिम बंगालमध्ये भारी ठरला आहे. ममतांना आता तृणमूल काँग्रेसचा विस्तार करायचा आहे व तृणमूलला राष्ट्रीय स्वरुप द्यायचे आहे. तृणमूलच्या कार्यकारिणीने तसा ठराव केला आहे. ममता त्यासाठी दौरे करत आहेत. महाराष्ट्रानंतर त्या गोवा, गुजरात, उत्तरप्रदेश, झारखंड वगैरे राज्यात जाणार असे सांगितले जात आहे. नरेंद्र मोदींच्या उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदार संघावरही त्यांची नजर आहे. महाराष्ट्र दौऱयात त्यांनी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत यांची भेट केली. या स्नेह भेटीत केंदाच्या इडी, सीबीआय व अन्य एजन्सीच्या कारवाया व भाजपा विरोधी संताप व्यक्त झाला. ममता सोबत त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी पण आहे. संजय राऊत यांच्याकडे चर्चा करताना त्यांनी महाराष्ट्र हा ईडी व सीबीआयला पुरुन उरेल असे म्हटले आहे. त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री त्यांना भेटण्याची शक्यता कमी आहे. पण पवार यांच्या घरी त्यांची भेट पक्की झाली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे भाजपा विरोधी राष्ट्रीय आघाडीसाठी उद्धव ठाकरे यांचे नाव नेते पदासाठी सूचवत असतात आणि शरद पवार तर या पदासाठी बाशिंग बांधून तयार आहेत. आता ते ममता दीदींना कसा पाठिंबा देणार हे बघावे लागेल. पण भाजपा विरोधी सर्व पक्ष एकत्र करायचे हा कार्यक्रम असू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय स्वरुप घेण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण त्यांना ते जमलेले नाही. ममता बॅनर्जी व अरविंद केजरीवाल यांना तेच करायचे आहे. पण त्यांनाही मर्यादा आहेत. विरोधातले हे सारे पक्ष काँग्रेस विरोध करुन स्थापन झाले आहेत. त्यामुळे त्यांची मूळ काँग्रेस पक्षात विश्वाससार्हता शून्य आहे. या छोटय़ा पक्षांना काँग्रेसचे नेतृत्व मान्य करावे लागेल पण तशी त्यांची इच्छा दिसत नाही आणि सोनिया गांधी, राहूल गांधी या शरद पवार किंवा ममता बॅनर्जी अथवा केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली तिसऱया आघाडीत सहभागी होईल असे वाटत नाही. सोनिया गांधी किंवा राहूल गांधी यासंदर्भात उघड बोलले नाहीत पण काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व काँग्रेसचे विचारवंत खासदार कुमार केतकर यांनी काँग्रेस ‘एकला चलो रे’ साठी तयार असल्याचे म्हटले आहे. ओघानेच भाजपाविरोधी तिसऱया आघाडीची मोट बांधणे आणि यशस्वी करणे सोपे नाही. काँग्रेस जे सोबत येतील त्यांना सोबत घेईल पण नेतृत्व सोडणार असे वाटत नाही. कुमार केतकरांनी तृणमूल आमच्यासोबत आली तर ठीक पण आली नाही तर फारसा फरक पडत नाही असेही म्हटले आहे. वेगवेगळय़ा राज्यातील प्रादेशिक पक्ष हे आपल्या सोयीचे राजकारण करत असतात. ममता बॅनर्जी असो समाजवादी पार्टी असो त्यांनी कुणाचेही हात सोबत घेऊन सत्तेची खुर्ची सांभाळली आहे. नेहमी सोयीचे व सत्तेचे राजकारण केले आहे. त्यामुळे ही जी तिसरी आघाडी आकाराला येईल. ती परस्परांना दिलेले शब्द व नेतृत्व निष्ठा ठेवेल यांची कुणालाच खात्री असणार नाही. शरद पवार व उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र प्रयोग ताजा आहे. राजकारणात काहीही होऊ शकते पण प्रादेशिक पक्षांना आणि नेत्यांना राष्ट्रीय सत्तेचे घुमारे फूटू लागले आहेत. रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासारखे व्यावसायिक सल्लागार त्यासाठी खतपाणी घालत असतात. कोरोनाचा नवा अवतार, मंदी, महागाई आणि जातीय राजकारण व आरक्षण हे तप्त विषय आहेत. येणारा अर्थसंकल्प आणि पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल यावर राजकारणाची संभाव्य वाटचाल सुरु राहिल. लोकसभेची सदस्य संख्या वाढणार अशीही चर्चा आहे. 2024 पूर्वी ती वाढली तर सुमारे 888 लोकसभा सदस्य होतील आणि मतदार संघाच्या रचनाही बदलतील. काही ठिकाणच्या ताज्या जनमत चाचण्या भाजपाला अडचणीच्या ठरल्या आहेत. भाजपाची आमदार संख्या कमी झाली तर राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाला कसरत करावी लागणार आहे. आज घडीला काँग्रेस वगळून तिसरी आघाडी अशक्य वाटत आहे. शरद पवारांची चाल काँग्रेसच्या लक्षात आली आहे. ओघानेच प्रदेश काँग्रेसने एक ताजे पत्र लिहून सर्व काँग्रेस पदाधिकाऱयांना कोणतीही तडजोड न करता स्थानिक स्वराज्यसह सर्व निवडणुका स्वबळावर लढवा असे आदेश दिले आहेत. पक्षाचे हे आदेश जेथे सोयीचे तेथे पाळले जातील आणि जेथे गैर सोयीचे तेथे वेगळे नाव घेऊन सत्ता पदरात पाडून घेतली जाईल. नेत्यांना जसा स्वार्थ आहे तसा चेल्यानाही असतो. ओघानेच सोयीचे राजकारण हाच परवलीचा शब्द ठरेल. पवार, ममता भेटीत काय ठरते हे महत्वाचे पण या भेटीमुळे काँग्रेसच्या अडचणीत भर पडणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ‘जय मराठा जय बांगला’ घोषणेचे अंतरंग दिसतील. पवारांच्या हालचाली आणि खेळय़ा या संदर्भात काँग्रेस हायकंमाडने जाहीर वक्तव्य केले नसले तरी त्यांचे या साऱया हालचालीवर लक्ष आहे. वरवर पहाता ही भाजपा विरोधी तिसरी आघाडी वाटत असली व ती काँगेसला बरोबर घेणार असे वाटत असले तरी ही आघाडी जशी भाजपा विरोधी आहे तशी ती काँग्रेस विरोधी आहे.
Trending
- महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांवर गुन्हा! आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; अडचणी वाढण्याचे शक्यता
- नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लाट…मोदी सरकार जाणार…इंडिया सरकार येणार- बाळासाहेब थोरात
- वाळवा तालुक्याच्या विकासासाठी मताधिक्य द्यावे : खास . धैर्यशील माने
- शेतकरी व महिलांच्या प्रश्नांवर भाजपने बोलूच नये : उमेश आपटे
- रात्रीचा दिवस करून धैर्यशील माने यांना उच्चांकी मतांनी निवडून आणू- प्रकाश आवाडे
- पक्षफोडीची नाराजी मतदानातून उमटेल : मालोजीराजे प्रतिपादन
- दक्षिणोत्तर विकास पर्वामुळे ‘दक्षिण‘ची जनता मंडलिक यांच्या पाठीशी- राजेश क्षीरसागर
- कोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा : दोन लाखावर लोक जमतील