अपघात झाल्याचे तपासात स्पष्ट- विशेष निरीक्षकांकडून निवडणूक आयोगाला अहवाल सादर
कोलकाता, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या नंदिग्राममध्ये झालेल्या हल्ल्याबाबत विशेष निरीक्षकांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी आपला अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला. नंदिग्राम येथे अपघातामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्या असून त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असा चौकशी अहवाल आयोगाला प्राप्त झाला आहे. पायाला झालेल्या दुखापतीवेळी मुख्यमंत्र्यांकडे पुरेशी सुरक्षा होती, असेही या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याने ममता बॅनर्जी यांच्यासह तृणमूल काँग्रेसची नौटंकी उघड झाली आहे. विशेष निरीक्षक विवके दुबे आणि अजय नायक यांनी हा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला आहे.
ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांच्या पूर्वीच्या अहवालावर नाराजी व्यक्त करत निवडणूक आयोगाने विशेष निरीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागविला होता. शनिवारी निवडणूक आयोगाला आपला सखोल अहवाल सादर करण्यापूर्वी विशेष निरीक्षक विवेक दुबे आणि अजय नायक यांनी बंगालच्या नंदिग्राममधील अपघाताच्या जागेची पाहणी केली. तसेच अपघातावेळी त्यांच्या सुरक्षा टीममध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱयांचीही त्यांनी चौकशी केली. त्याचबरोबर वाहनताफ्यातील चालकांकडेही विचारपूस करण्यात आली. या चौफेर चौकशीअंती निरीक्षकांनी ममतांच्या पायाला झालेली दुखापत ही अपघातामुळे झाली असून त्यांच्यावर कोणीही हल्ला केलेला नाही, असा निष्कर्ष काढला आहे.
सुरुवातीचा अहवाल आयोगाने ठरवला ‘अर्धवट’
नंदिग्राममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर 10 मार्च रोजी झालेल्या कथित हल्ल्याचा बंगाल सरकारचा अहवाल निवडणूक आयोगाला प्राप्त झाला होता. मात्र, या अहवालामध्ये कोणतेही पुरावे, प्रत्यक्षदर्शी किंवा व्हिडीओ फुटेजचा संदर्भ न आढळल्याने आयोगाने सदर अहवाल ‘अर्धवट’ असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आयोगाने विशेष निरीक्षकांना सखोल आणि अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. ही घटना कशी घडली आणि त्यामागे कोण असू शकते? याचा दाखलाही देण्याची सूचना आयोगाने केली होती. सुरुवातीला शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात, घटनास्थळी मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या जमावाचा उल्लेख होता. परंतु ममतांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप असलेल्या ‘चार-पाच जणांचा’ कोणताही उल्लेख करण्यात आला नव्हता. तसेच कथित हल्ल्याचे व्हिडीओ फुटेजसुद्धा नव्हते.
पोलिसांनीही केला होता हल्ल्याचा इन्कार
नंदिग्राम येथे बुधवारी ममता बॅनर्जी ज्या घटनेत जखमी झाल्या, ती घटना हा हल्ला नव्हता, तर अपघातच होता, अशी स्पष्टोक्ती पश्चिम बंगाल पोलिसांनी दिली होती. या घटनेचे संपूर्ण व्हिडीओ चित्रण उपलब्ध आहे. त्यातून ही घटना कशी घडली हे स्पष्टपणे दिसून येते. तसेच पोलिसांनी ही घटना पाहिलेले स्थानिक नागरिक व त्यावेळी उपस्थित असणारे स्थानिक पोलीस यांच्याकडूनही माहिती घेतली. त्यातून हा घातपात नसून केवळ अपघातच आहे, हे सिद्ध होते, असेही पोलिसांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले होते.
ममता बॅनर्जींचा आरोप
आपण कारचा दरवाजा उघडून लोकांना अभिवादन करीत असताना चार-पाच लोकांनी आपल्याला ढकलले आणि गाडीचा दरवाजा बंद केला. या हल्ल्यामुळे आपण जखमी झालो, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला होता. तृणमूल काँगेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही त्वरित त्याचीच री ओढली होती. त्यानंतर तृणमूलच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत सुस्पष्ट तपासाची मागणी करत अतिरिक्त सुरक्षा पुरविण्याचीही मागणी केली होती. तथापि, आयोगाला आता प्राप्त झालेल्या अंतिम तपासातील निष्कर्षामुळे तृणमूलच्या हय़ा सर्व प्रयत्नांवर पाणी फिरले आहे.