28 वे जनरल म्हणून रावत यांच्या हस्ते स्वीकारला पदभार : 13 लाख सैनिकांचे प्रमुख : इस्टर्न कमांड प्रमुख म्हणून होते कार्यरत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महाराष्ट्राचे सुपुत्र मनोज मुकुंद नरवणे यांनी जनरल बिपिन रावत यांच्या हस्ते मंगळवारी देशाच्या ‘सैन्यप्रमुख’ पदाची सुत्रे स्वीकारली. लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे हे 28 वे सैन्यप्रमुख ठरले आहेत. सेवानिवृत्त बिपिन रावत यांनी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस’चा पदभारही स्वीकारला आहे. ते आता संरक्षण मंत्रालयासाठी प्रमुख सल्लागार आणि तिन्ही दलांचे संयुक्त प्रमुख असतील. नरवणे यांनी दहशतवाद कठोरपणे निपटून काढण्याबरोबरच देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याबाबत कटिबद्धता व्यक्त करत ग्वाही दिली.
मंगळवारी मावळते सेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांनी लेफ्टनंट मनोज नरवणे यांना लष्करप्रमुख पदाचे बॅटन सोपवले. तत्पूर्वी सकाळी रावत यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. रावत यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, नूतन सैन्यप्रमुख मनोज नरवणे, वायुदल प्रमुख आरकेएस भदौरिया आणि नौदल प्रमुख करमबीरसिंग हे एनडीएच्या 1976 च्या 56 व्या बॅचचे कॅडेट आहेत. तिघांनी एकाच वर्षी प्रशिक्षण पूर्ण करुन आपापल्या दलामध्ये सेवेला प्रारंभ केला होता. यापूर्वी 1991 मध्येही तिन्ही दलांचे प्रमुख एकाच बॅचचे होते.
मूळचे पुण्याचे
मुळचे पुण्याचे असणाऱया मनोज नरवणे यांचे शिक्षण ज्ञानप्रबोधिनीमध्ये झाले आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीएमधून सैन्य प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जून 1980 मध्ये शीख लाईट इन्फंट्रीच्या 7 बटालियनमधून सेवेस प्रारंभ केला होता. एनडीएमधून शिक्षण पूर्ण करणारे ते 13 प्रमुख ठरले आहेत. तब्बल 37 वर्षांच्या सेवाकालामध्ये सैन्याच्या विविध विभागामध्ये काम केले आहे. जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय रायफल्सचे नेतृत्व केले आहे. आसाम रायफल्स पूर्व विभागाचे इन्स्पेक्टर जनरल, स्ट्राईक कोअरचे जनरल ऑफिसर इन कमांडिंग, लष्कर प्रशिक्षण विभाग प्रमुख, युद्धशास्त्र प्रशिक्षक याही जबाबदाऱया सांभाळल्या आहेत. दहशतवाद, फुटीरतावाद विरोधात लढण्याचा त्यांचा दीर्घ अनुभव आहे.
विविध आघाडय़ांवर सेवा आणि गौरव
त्यांना विशिष्ट सेवा मेडल, सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडलने गौरवण्यात आले आहे. उपलष्करप्रमुख होण्यापूर्वी ते पूर्व कमांडचे नेतृत्व करत होते. चीनबरोबर असलेल्या 4 हजार किलोमीटर सीमा रेषेची सुरक्षा त्यांच्याकडे होती. श्रीलंकेमध्ये शांतीसेनेतही ते सहभागी होते. याशिवाय म्यानमारमध्ये तीन वर्षे डिफेन्स ऍटॅची म्हणून काम केले आहे.
नूतन सैन्यप्रमुखांचे वेगळेपण
सैन्यप्रमुख म्हणून 2 वर्षे 4 महिन्यांचा कालावधी मिळणार
चीन विषयाचे तज्ञ म्हणून ओळख
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढण्याचा दीर्घ अनुभव
युद्धकालीन, दहशतवादग्रस्त क्षेत्रात, शांतता कालावधीतही उत्तम काम
राष्ट्रीय रायफल्स, स्ट्राईक कॉर्पस्, प्रशिक्षण कमांडचे नेतृत्व
दहशतवाद कठोरपणे निपटून काढू
नूतन सैन्यप्रमुख मनोज नरवणे म्हणाले, 370 कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवाया संपुष्टात येत आहे, हे चांगले लक्षण आहे. दहशतवाद जागतिक समस्या असून भारत दीर्घकाळापासून त्याला तोंड देत आहे आमचा शेजारी देश दहशतवादाआडून आमच्याशी छद्म युद्ध करत आहे. दीर्घकाळापासून त्यांचा हाच प्रयत्न आहे. परंतु सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक नंतर या देशाला भारताच्या बदलत्या धोरणांचा प्रत्यय आला आहे. सीमेपलीकडे काही ठिकाणी दहशतवाद्यांचे लाँच पॅड आहेत. मात्र हा दहशतवाद कठोरपणे निपटून काढू, असा इशारा त्यांनी पाकिस्तानला नाव न घेता दिला.