रायगडसह धाराशिव, सोलापूर येथे दौरा करणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने दिलेली आश्वासने पाळलेली नाही. त्यामुळे 25 ऑक्टोबरपासून मराठा समन्वयकांसोबत पुन्हा राज्यव्यापी दौरा सुरु करणार आहे. याची सुरुवात पनवेल (जि. रायगड) येथून केली जाणार आहे. याबरोबरच सोलापूर व धाराशिव जिह्यातही दौरा केला जाईल, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिला. तसेच या सरकारसोबत पुन्हा चर्चेला जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. नवरात्रौत्सवानिमित्त भवानी मंडप येथील श्री. तुळजाभवानीचे दर्शन खासदार संभाजीराजे व संयोगिताराजे छत्रपती यांनी घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, काल, मंगळवारी आपण `एमपीएससी’साठी तयारी करत असलेल्या युवकांसंदर्भात `ट्वीट’ केलं होतं. दोन वर्षे `एमपीएससी’च्या परीक्षा झालेल्या नाहीत. कोरोनाच्या महामारीमुळे परिक्षा पुढे ढकलत असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले होत. त्यावेळी विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा वाढवून देऊ, असा शब्द दिला होता. परंतु काही दिवसांपूर्वी `एमपीएससीने’ प्रसिध्द केलेल्या जाहीरातीमध्ये वयोमर्यादा वाढविल्या बद्दलचा कोणताही उल्लेख न करता दोन वर्षे तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना बेदखल केले आहे. सरकारने शब्द दिल्याप्रमाणे वयोमर्यादा वाढवावी, अन्यथा तरुणांचा उद्रेक होईल.
ते पुढे म्हणाले, मराठा समाजाला न्याय मिळावा आणि बहुजन समाजाला जोडण्यासाठी आपला लढा सुरु आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यामुळे त्यापुढे आपल्याला कसं जाता येईल, याचे टप्पे आपण संसदेत सांगितले होते. पहिला टप्पा हा राज्य मागासवर्गीय आयोग नेमणे असून तो राज्य सरकारच्या हातातील आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अद्यापही याबाबत कार्यवाही केलेली नाही. तसेच यापूर्वी सरकारकडे मराठा समाजासाठी मुलभूत पाच सवलतींची मागणी केली होती. त्यातील `सारथी’ वगळता अन्य मागण्यांबाबत दिलेला शब्द सरकारने पाळलेला नाही. त्या राज्य सरकारच्या हातात असतानाही पूर्ण झालेल्या नाहीत. इतर मागण्यांमध्ये ज्या मुलांच्या नोकरीमध्ये नियुक्त्या झाल्या आहेत, त्यांना अद्याप त्या देण्यात आलेल्या नाहीत. त्यांना सरकाने सुपर न्यूमररी अधिनियम काढून नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे, अण्णासाहेब विकास महामंडळाच्या बाबतीत ही गेल्या तीन महिन्यात काहीही सरकारने केलेले नाही. `ओबीसी’ प्रमाणे शिक्षणात सवलती देण्याच्या मागणीकडेही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आपण सर्व मराठा समन्वयकांसोबत पुन्हा एकदा राज्यव्यापी दौरा सुरु करत आहोत. 25 ऑक्टोबरला पनवेल रायगड पासून सुरवात करून सोलापूर, धाराशिव, या जिह्यात दौरा केला जाणार आहे.
सरकारकडून कोरोनाचे कारण चालणार नाही
आम्ही दोन-तीन महिने शांत होतो. दरम्यान नांदेडच्या सभेनंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठवली. त्यावर ही काहीही चर्चा झालेली नाही. प्रत्येक वेळी कोरोनाचे कारण पुढे करण्यात आलेला आहे. यापुढेही असेच चालणार नाही. त्यामुळे आमचे दौरे परत एकदा सुरू होणार आहेत. आम्ही भविष्यात मूक आंदोलनही चालू ठेवणार आहोत. आक्रमकपणाची झलक सरकारला पुढे दिसेल. त्यासाठी लाँग मार्च, आझाद मैदानवर उपोषण असे पर्यायही आमच्यासमोर आहेत, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला.
टीकाकारांनी मराठा समाजासाठी वेळ द्यावा
मराठा आरक्षणाबाबतच्या संभाजीराजे यांच्या भूमिकेबाबत काहीजण टिका करत आहेत, याबाबत विचारले असता संभाजीराजे यांनी कुणी टीका करतं त्याकडे मी लक्ष देत नाही, टीकाकारांना विनंती आहे त्यांनी आपला वेळ समाजासाठी द्यावा, असा टोला लगावला. तसेच आपण व खासदार उदयनराजे भोसले यांच्यात लहान व मोठा बंधू असे नाते आहे. त्यामुळे सातारा व कोल्हापूर गादी यांच्यात मतभेद असण्याचा प्रश्नच नाही. आम्ही दोघेही मराठा आरक्षणासाठी लढत आहे, असे संभाजीराजे यांनी प्रसिध्दीमाध्यमांच्या प्रश्नावर स्पष्ट केले.