एसईबीसी आरक्षण वगळून शैक्षणिक प्रवेश देण्याच्या शासन आदेशावर होणार चर्चा
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्य शासनाने एसईबीसी आरक्षण थांबवून अकरावीसह इतर शैक्षणिक प्रवेशाची प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिल्यानंतर मराठा समाजात रोष निर्माण झाला आहे. या आदेशामुळे मराठा विद्यार्थ्यांना आता खुल्या प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेश घ्यावा लागणार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चाची झूम ऍपवर ऑनलाईन बैठक झाली. यावेळी पुढील दिशा ठरविण्यासाठी दोन दिवसांत मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एसईबीसी आरक्षण थांबवून शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर आता मराठा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने आदेश देताना एसईबीसीच्या जागा संरक्षित कराव्यात किंवा न्यूमररी पद्धतीने जागांची संख्या वाढवावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती. पण राज्य शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष करत थेट मंगळवार 24 नोव्हेंबरच्या आदेशानुसार एसईबीसी आरक्षण थांबवून शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एसईबीसी आरक्षण थांबवून राज्य शासन शासकीय नोकर भरती करण्याच्या दृष्टीने तयारी करत असल्याचे वृत्त आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यशासन, न्यायालय स्तरावरील आणि रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी व्यूहरचना आणि रणनीती ठरविण्यासाठी दोन दिवसांत मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक घेण्याचा निर्णय शुक्रवारच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला. बैठकीत राजेंद्र कोंढरे, नरेंद्र पाटील, दिलीप पाटील यांच्यासह राज्यातील समन्वयक उपस्थित होते.