सतीश जारकीहोळी यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
भाजपला विजयासाठी झगडावे लागले. माझा काही मतांनी पराभव झाला तो मी मान्य करतो. कारण जनतेचा आदर करणे हे माझे कर्तव्य आहे. मात्र भाजपची जी टक्केवारी घसरली आहे त्या टक्केवारीला केवळ मराठी भाषिकांवर केलेला अन्यायच असल्याचे मत आमदार सतीश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
गेल्या दीड ते दोन वर्षांमध्ये पोलिसांकडून मराठी भाषिकांवर गुन्हे नोंदविले गेले आहेत. मराठी भाषिकांना मतस्वातंत्र्य आहे. त्यांच्यावर आम्ही कोणताच दबाव आणू शकत नाही. मात्र त्यांना काही जणांनी भडकविले आहे. हे भडकविणारे कोण? सत्ताधारी पक्षच असून मराठी भाषिकांवर गुन्हे नोंदविले असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांमध्ये मराठी भाषिकांच्या बाबतीत पोलिसांचे वर्तन हेच भाजपला मारक ठरले आहे. त्यामुळे त्यांना कमी मताधिक्य मिळाले असल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसचा जो पराभव झाला हा अनपेक्षित होता. यामुळे मी निराश झालो आहे. मात्र लोकशाहीमध्ये जनादेश मानलाच पाहिजे आणि तो मी मानतो, असेही त्यांनी सांगितले.
भाजपने लोकसभा पोटनिवडणूक जिंकूनही हा आपला विजय नाहीच म्हटले आहे. त्यामुळे भाजपने जनतेचा आदरही राखला नाही. गोकाकमध्ये जे कमी मतदान झाले आहे ते केवळ पैशाचे वाटप केल्यामुळे झाले आहे. मताला 200 रुपये प्रमाणे रक्कम वाटण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला. रमेश जारकीहोळी हे घराबाहेर पडले नाहीत. हे सर्व कार्यकर्त्यांनी पैशाचे आमिष दाखवून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
चामराजनगरात जी दुर्घटना घडली आहे त्याची जबाबदारी घेण्यास सरकारमधील एकही व्यक्ती तयार नाही. ऑक्सिजन टंचाईबाबत सरकार गांभीर्य घेण्यास तयार नाही. ऑक्सिजनविना अनेकांचे प्राण जात आहेत. मात्र सरकारचे त्याकडे लक्ष नाही, असा आरोप देखील त्यांनी केला.