ऑनलाईन टीम / मुंबई :
‘मरिला डिस्कव्हरी’ या क्रुझवर मागील महिन्याभरापासून अडकून पडलेल्या 146 भारतीय खलाशी व नाविकांना मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नानंतर नौकानयन मंत्रालयाने यासंदर्भात आदेश जारी केला. समुद्रात ठिकठिकाणी जहाजांवर अडकलेल्या अंदाजे 40 हजार खलाशी आणि जहाजावरील कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे.
उद्या सकाळपासून या क्रुझवरील खलाशांना व कर्मचाऱ्यांना मुंबई बंदरावर उतरविणे सुरु होईल. त्यांची वैद्यकीय तपासणीही होणार आहे. प्रसंगी त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी एक इमारतही उपलब्ध करण्यात आली आहे.
2 ते 6 एप्रिल या कालावधीत मरिला डिस्कव्हरी ही क्रुझ कोचीन, न्यू मंगलोर, गोवा आणि मुंबई अशा ठिकाणी पोहचणार होती. दरम्यान, कोरोनाचा उद्रेक सुरु झाला आणि या क्रुझने लाएम चाबँग थायलँड येथे 14 मार्च रोजी सर्व प्रवासी सोडले. ही क्रुझ 12 एप्रिल रोजी कोचीन येथे पोहचली पण या क्रुझवरील कर्मचाऱ्यांना उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली. नंतर ही क्रुझ मुंबईजवळच्या समुद्रात 14 एप्रिलला पोहचली आणि तेव्हापासून त्यावरील कर्मचारी मुंबईला उतरण्याची वाट पाहत होते.
जहाजावरील कोणत्याही कर्मचाऱ्यास कोरोना लागण झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. थायलँड सोडून 37 दिवस होऊन गेले. तरी देखील खलाशांना बंदराबर उतरण्याची परवानगी मिळत नव्हती. अखेर मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याने नौकानयन मंत्रालयाने खलाशी व नाविक यांना मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी दिली.