नुकताच दरबाराच्या कामकाजातून मोकळय़ा झालेल्या राजाला होमशाळेत आलेल्या अतिथींना भेटावे लागते. आदरातिथ्य करावे लागते. दोन्ही तापसी राजाची स्तुती करतात आणि त्याचे भले चिंतून आशीर्वाद देतात. तो काश्यप ऋषींचे क्षेमकुशल विचारतो. त्यांचे क्षेमकुशलवर्तमान कळल्यावर गर्भवती असलेल्या शकुंतलेचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर असा काश्यपांचा निरोप शार्ङ्गरव राजाला सांगतो. गौतमीही त्याला दुजोरा देते. ती म्हणते, ‘हिने आपल्या वडिलांना विचारले नाही की तुम्हीसुद्धा आपल्या नातेवाईकांना विचारले नाही. तुमच्या दोघांमधल्याच ह्या गोष्टीबद्दल मी तुम्हांला काय सांगणार?’ राजाला ते ऐकून धक्काच बसतो. त्याला हे काही तरी कुभांड रचले आहे असे वाटते. तो काश्यपांचे म्हणणे अजिबात मान्य करीत नाही. तेव्हा शकुंतला चकितच होते. शार्ङ्गरव म्हणतो ‘ तुम्ही असे कसे म्हणता? एखादी स्त्री कितीही पतिव्रता असली, तरीही तिचेच आप्तजन तिच्यावर शंका घेतात. म्हणून ती प्रेयसी तरूण असो अगर नसो, पण तिने आपल्या पतीपाशीच रहायला हवे.’ राजाला वाटते आपण हिच्याशी लग्न केले आहे? तो ते मान्यच करीत नाही. तेव्हा शकुंतलेला आपल्या मनात जी भीती होती ती खरीच आहे की काय असे वाटते.
शार्ङ्गरव त्याला सुनावतो, केलेल्या कर्माला नाकारणे राजाला शोभून दिसत नाही. बरोबर आहे, ऐश्वर्याने उन्मत्त झालेल्या लोकांत असे दुर्गुण असायचेच! राजाला मात्र हा आपल्यावर भयंकर आरोप होत आहे असे वाटते. तेव्हा गौतमीही पुढे येते आणि शकुंतलेला लाज थोडी बाजूला ठेवून बुरखा बाजूला करायला सांगते. कारण तिची खरी ओळख पतीला पटेल. राजा तिचे सौंदर्य पाहून विचार करू लागतो की, इतके सुंदर रूप माझ्याकडे सहज चालून आले आहे. तरी माझी बुद्धी अशी भ्रमित का बरे झाली आहे? मी तिला माझी पत्नी म्हणून स्वीकारू इच्छित नाही! राजाला स्तब्ध राहिलेले पाहून शार्ङ्गरव त्याला त्याबद्दल विचारतो. तेव्हा राजा त्यांना सांगतो, ‘तपस्व्यांनो, मी कितीही विचार केला तरी मी हिचा स्वीकार केल्याचे स्मरत नाही. ती गर्भवती दिसत असूनही मी हिचा नामधारी पती म्हणून स्वीकार कसा करू?’
शार्ङ्गरव रागाने म्हणतो, ‘स्वतः एखाद्या मुलीला भ्रष्ट करून, नकार देणाऱया तू मुनींना लाज आणलीस. तू तर एक नामवंत चोर आहेस!’ शारद्वत शार्ङ्गरवाला थांबवतो. शकुंतलेबाबत जेवढे सांगणे शक्मय होते ते सांगितले, तरी राजा जर असे बोलत असेल तर त्याला त्याची खात्री पटवणारे काही तरी उत्तर दिले पाहिजे असे तो सांगतो. शकुंतलेला आता स्वतःबद्दल रडत बसणे एवढेच आपल्या नशिबी आहे असे वाटते.