वसंतसेना आर्य चारुदत्ताच्या पायावर पडून रडत असते. सारे लोकही ‘वसंतसेना जिवंत आहे’ असे आपसात बोलत असतात. तेव्हा चारुदत्ताच्या साऱया जाणीवा हळुहळू जाग्या होतात. आपल्या पायावर पडलेल्या वसंतसेनेचा ओळखीचा स्पर्श त्याला जाणवतो. तो डोळे बंद करून ओळखतो आणि सद्गदित आवाजात आनंदाने म्हणतो, ‘प्रिये! वसंतसेने तू?’ वसंतसेना ती मीच आहे हे सांगते. चारुदत्ताला तिचे अचानक तिथे प्रकट होणे हे एखाद्या संजीवनी मंत्राप्रमाणे वाटते. आता मरणाच्या दारात जाऊन आलेला आपला देह आपल्या प्रियेच्या अनपेक्षितपणे इथे येण्यामुळे सजीव होऊन आल्यासारखा त्याला वाटते. जणू पुनर्जन्मच आपल्याला मिळाला! त्याचवेळी वधस्तंभाकडे नेताना घातलेले लाल वस्त्र आणि फुलांची माळ त्याला आता लग्नमंडपात जाताना केलेल्या वराच्या वेशभूषेसारखे वाटत होते. तर वाजणारे नगारेदेखील विवाहसमयी वाजणाऱया नगाऱयासारखे वाटत होते. मनाची वृत्ती बदलल्यावर सारे जगच जणू बदलल्यासारखे झाले. वसंतसेनेला ही सारी अनिष्ट वेळ चारुदत्ताच्या अतिउदारपणामुळे आली असे वाटत होते. तो दरिद्री झाला नसता, तर असे काही घडलेच नसते कदाचित!
चारुदत्त तिला सांगतो की आधीच शत्रुत्व असलेल्या शकार माझ्यावर तुला मारल्याचा खोटा आळ आणून स्वतःऐवजी मला नरकात लोटू पहात होता. त्यामुळे लोकांच्या दृष्टीने मी कलंकित ठरलो. वसंतसेना त्याला असं काही बोलू नका. त्या शकारानेच मला मारले होते. पण ह्या भल्या माणसाने मला जीवनदान दिले. ती भिक्षुकडे बोट दाखवते. तेव्हा चारुदत्त ‘हा कोण’ असे तिला विचारतो. ‘आर्य चारुदत्त, आपण मला ओळखले नाही? मी आपले पाय चेपून देणारा संवाहक आहे. जुगाऱयांकडून मी पकडला गेलो, तेव्हा हिने हा आपलाच माणूस आहे असे मानून आपले दागिने देऊन मला त्यांच्या तावडीतून सोडवले होते. तेव्हापासून मी जुगार खेळण्याचे सोडून बौद्ध संन्यासी झालो. ह्या बाईसाहेब गाडीची अदलाबदल झाल्याने पुष्पकरंडक उद्यानात येऊन पोचल्या होत्या. तेव्हा त्या नीच माणसाने ‘मला त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मानत नाहीस ना?’ असे म्हणून हिचा गळा आवळून हिला जबरदस्तीने मारलं. मी स्वतः पाहिलं!’
असा संवाद चालू असताना पडद्याच्या आत मोठा गोंगाट ऐकू येतो. वृषभध्वज शंकर की जय। तसेच क्रौंचराक्षसनाशक स्वामी कार्तिकेयांचा विजय असो।त्यानंतर प्रमुख शत्रू राजा पालकाचा वध करणाऱया अहीरपुत्र आर्यकाचा विजय असो।ज्यांनी धवल कैलासपर्वतरूपी पताका असलेली संपूर्ण विशाल पृथ्वी जिंकली आहे.