प्रतिनिधी /बेळगाव
शहरात विविध ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागून पाणी वाया जात आहे. गळती निवारणाकडे पाणीपुरवठा मंडळाचे दुर्लक्ष झाले होते. आता त्यांच्याप्रमाणेच एल ऍण्ड टी कंपनीदेखील गळती निवारणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. महात्मा फुले रोड परिसरात जलवाहिनीद्वारे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असल्याने याची दुरुस्ती होणार का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
शहर आणि उपनगरांत जलवाहिन्यांचे जाळे पसरले आहे. मात्र ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागल्याने व व्हॉल्वमधून पाणी वाया जात आहे. तसेच काही ठिकाणांच्या कूपनलिका नादुरुस्त असल्याने नागरिकांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. एकीकडे गळतीद्वारे पाणी वाया जात आहे तर दुसरीकडे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा स्थितीत जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची दखल घेतली जात नाही. शहरात ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागून पाणी वाया जात असल्याच्या तक्रारी पाणीपुरवठा मंडळाकडे केल्या होत्या. मोठय़ा प्रमाणात असलेल्या गळत्यांची दुरुस्ती केली जात होती. मात्र लहान गळत्यांकडे दुर्लक्ष केल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. पाणीपुरवठा मंडळाप्रमाणेच एल ऍण्ड टी कंपनीनेदेखील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीकडे कानाडोळा केला आहे. महात्मा फुले रोड परिसरात जलवाहिनीला गळती लागली असून याबाबत तक्रारी करूनही दुरुस्ती केली नाही. त्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. अशाप्रकारे असंख्य ठिकाणी गळत्या असून याची दुरुस्ती करून शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.