अरुण आठल्ये/ रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गवर रंदीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. महामार्गामुळे विकासाला चालना मिळणार असली तरी कोकणातील अनेक गावांनी वर्षानुवर्षे जपलेले ‘गावपण’ मात्र हरवत चालले आहे. चौपदरीकरणासाठी जुन्या झाडे जमीनदोस्त झाली आहेत. गावात जाणारे लहान रस्ते, पायवाटा, दुकाने, घरांच्या पाऊलखुणाही संपुष्टात आल्या आहेत. वर्षानुवर्ष मनावर कोरले गेलेले गावाचे चित्र महामार्गाने पुरते पुसून टाकल्याची खंत अनेकजण विशेषत: चाकरमानी आवर्जून व्यक्त करीत आहेत.
या मार्गावर अनेक गावे वसली आहेत. या गावांची जुनी ओळख पुसली जाणार आहे. रस्त्याकडेच्या कौलारू घरांची जागा आता टोलेजंग सिमेंट काँक्रिटच्या इमारतींनी घेतली आहे. झापाच्या छोटेखानी टपऱया नामशेष होत असून कॉंक्रिटचे बांधकाम होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छाया देणारी शंभर दिडशे वर्ष जुनी झाडे केव्हाच वखारींची भक्ष्य बनली आहेत. पाण्याचा निचरा होणारे स्रोतही भरावांमुळे बाधित झाले आहेत. तोडलेल्या झाहांच्या जागी नवीन झाडे लावण्याची सुरुवातही झालेली नाही. प्रवासात कंटाळा आला थांबण्यासाठी सावलीचा पत्ताच लागत नाही. हा महामार्ग हरीत महामार्ग असेल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र सध्या फक्त ‘रखरखाट’च दिसत आहे. अंतर्गत रस्ते शोधताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. रुंदीकरणामुळे घराचे आंगण, मंदिर, शाळाही रस्त्याच्या जवळ आल्या आहेत. त्यामुळे रस्त्यानजीकच्या गावांची ओळखच पुसली गेल्याचे म्हटले जात आहे.