ऑनलाईन टीम / मुंबई :
सध्या अनेकांकडून महाराष्ट्राच्या बदनामीचा कट रचला जात आहे. मात्र, ही बदनामी सहन केली जाणार नाही. राजकारणावर बोलण्याची ही वेळ नाही. मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून मी राजकारणावर बोलेन. सध्या माझं कोरोनावरचं लक्ष राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, मिशन बिगिन अगेनमध्ये लोकांचे आयुष्य पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे, असे असताना काही लोकांकडून राजकारण केलं जातं आहे. जाणीवपूर्वक महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत मी राजकारणावर बोलणार नाही. कोरोनावर माझं लक्ष असेल. वेळ आली की मी या सर्व मुद्द्यांवर बोलेन.
ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये यासाठी विनाकारण लोकांनी घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्सिंग पाळावे. तसेच मास्कचा वापर करावा. प्रत्येक भागाचे खासदार, आमदार, नगरसेवक यांनी आपल्या भागाची काळजी घ्यावी. पुढील महिन्यात प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी एक पथक जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.