मुंबई \ ऑनलाईन टीम
केंद्र सरकारने ओबीसींची शुद्ध फसवणूक केली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण या राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं. या राज्य सरकारला आरक्षण द्यायचं नाही आहे. ओबीसींना फसवण्याचं काम हे सरकार करतंय, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांनी केंद्रावर खापर फोडलं नाही. त्यांना माहिती आहे देशात सगळीकडे ओबीसी आरक्षण सुरु आहे. कुठेही गेलेलं नाही फक्त महाराष्ट्रात आरक्षण गेलं आहे. या राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि अजूनही त्यांचा नाकर्तेपणा सुरु आहे. या राज्य सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचं नाही आहे. या राज्य सरकारला महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत चालढकल करायची आहे. तोपर्यंत कारणं द्यायची आहेत आणि तोच प्रकार सध्या सुरु आहे.
ओबीसी आयोगाने स्वत: राज्य सरकारला पत्र पाठवून आम्हाला पैसे द्या, आम्हाला इम्पेरिकल डेटा जमा करायचा आहे, असं सांगतिलं आहे, असं फडणवीस म्हणाले. आम्ही मराठा आरक्षणाच्यावेळी चार महिन्यात डेटा गोळा केला होता. सरकारने मनात आणलं तर होऊ शकेल, पण सरकारच्या मनात नाही हे स्पष्ट आहे. ओबीसींना फसवण्याचं काम या सरकारचं चालू आहे, असं फडणवीस म्हणाले.