ऑनलाईन टीम / नाशिक :
महाराष्ट्रात कोरोना जाणवत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. मुंबई, पुण्यानंतर आता नाशिक शहरातही लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे.
या परिस्थितीला नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. अमूकच लस कशाला हवी? मिळेल ती लस घेऊन देशातील जनतेला द्या ना, लसीचा अट्टाहास करू नका. अरे, माणूस जगला पाहिजे, ही बाब महत्वाची आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये देखील सकाळपासून लांबच लांब रांगेत उभे राहून देखील नाशिककरांना रेमडेसीवीर मिळत नसल्याने लोक रस्त्यावर उतरले असून सरकार विरोधात आंदोलन करताना दिसत आहेत.
- लस आमच्या घरात तयार होत नाही : भुजबळ
लस उपलब्ध नसल्याने नागरिकांनी आंदोलन केले याकडे भुजबळांचे लक्ष वेधले असता, त्यावर लोकं रस्त्यावर उतरणार त्याला काय करणार? अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले, माझ्या घरात तर मी इंजेक्शनचा साठा केलेला नाही. कलेक्टरच्या घरातही साठा नाही आणि रेमडेसिव्हिर लस काय आमच्या घरी तयार होत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, एखाद्या दुकानात जर साठा करण्यात आलेला असेल आणि मला कळले तर तिथे जाऊन कारवाई करून इंजेक्शन रुग्णांसाठी उपलब्ध करून देत असतो असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
- … हे वक्तव्य दुर्दैवी व जबाबदारी झटकणारे : प्रवीण दरेकर
“रेमडिसिव्हीअर घरी तयार होत नाही” हे छगन भुजबळ यांचे वक्तव्य दुर्दैवी व कर्तव्य आणि जबाबदारी झटकणारे आहे! यामधून भुजबळांनी सरकारची हतबलता दाखवली. नाशिकचे पालकमंत्री असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना असे बेफिकीरीचे वक्तव्य शोभा देणारे नाही!, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.