नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती चिंताजनक होत असतानाच आता देशभरातही कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. दैनंदिन रुग्णवाढीत महाराष्ट्र वरचढ ठरत असून देशात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱया 10 जिल्हय़ांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी बुधवारी दिली. तसेच पंजाब, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्येही नव्या बाधितांचा आकडा वाढत असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 28 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या जास्त असल्याचे राजेश भूषण यांनी नमूद केले. गुजरातमध्ये दिवसाला 1,700 तर मध्य प्रदेशात दिवसाला 1,500 रुग्ण सापडत आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण सूरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगरमध्ये आहेत. मध्यप्रदेशात भोपाळ, इंदोर, जबलपूर, उज्जैन आणि बेतूलमध्ये जास्त रुग्ण सापडत असून या सर्व भागांमध्ये वेळीच कडक उपाययोजना राबविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
देशात 24 तासात 47,262 नवे रुग्ण
देशात मागील 24 तासात 47 हजार 262 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 275 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1 कोटी 17 लाख 34 हजार 058 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 60 हजार 441 इतका झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात 23 हजार 907 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1 कोटी 12 लाख 05 हजार 160 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आह. देशात अजूनही 3 लाख 68 हजार 457 सक्रिय रुग्ण असून ते विविध इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत.
चाचणी-लसीकरण वाढविण्याचा सल्ला
कोरोनाची रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्यामुळे संपूर्ण देशाच्या चिंतेत वाढ झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्र सरकारने ‘टेस्ट-ट्रक-ट्रीट’ या त्रिसूत्रीचे कठोरपणे पालन करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. तसेच स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन गरज भासल्यास जिल्हा, तालुका, शहर किंवा प्रभाग पातळीवर निर्बंध घालू शकतात, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. नव्या मार्गदर्शक सूचना 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत.
सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या. तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनासंदर्भात चिंतेत भर टाकणारी आकडेवारी आली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग पंधराव्या दिवशी वाढ नोंदविण्यात आली आहे. सक्रिय रुग्णसंख्या आता 3 लाख 68 हजारांवर पोहोचली आहे. सततच्या रुग्णवाढीमुळे रिकव्हरी रेट 95 टक्क्मयांवर आला आहे.