ऑनलाईन टीम / मुंबई :
सध्या महाराष्ट्रातील हॉटेल 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी होती. आता ही वेळ रात्री 10 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासोबतच राज्यातील मॉल आणि जीम देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार आहे. तसेच 15 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक बुधवारी पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, मुंबईतील हॉटेल, उपहागृह 50 टक्के क्षमतेनुसार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. या अंतर्गत हॉटेल मधील सर्व कर्मचाऱयांनी दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. या सोबतच कर्मचाऱयांना मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासोबत वेटिंगमध्ये उभे असणाऱया ग्राहकांना सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे, मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे.
लोकल टेन्सबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले, लोकल ट्रेन्समधून प्रवास करताना आता डबल डोस आणि दुसऱया डोस नंतरचे 14 दिवस झालेले असणे आवश्यक आहे. अशा व्यक्तिंना प्रवास करण्यास परवानगी असणार आहे.
बैठकीत झालेले अन्य निर्णय :
- सिनेमागृह, नाटय़गृहे, मल्टीप्लेक्स पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.
- धार्मिकस्थळे, प्रार्थनास्थळे बंदच राहतील.
- खुली मंगलकार्यालयात 200 लोकांची अट
- शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय टास्कफोर्स आणि शिक्षण मंडळाबरोबर बैठक घेतल्यानंतर घेतला जाईल.
- इनडोअर गेम्ससाठी लसीचे दोन डोस झालेल्यांनाच मान्यता