प्रतिनिधी/ बेळगाव
सौंदत्ती येथील रेणुका देवी यात्रेसाठी महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात भक्त येत असतात. मात्र मंदिर परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरलेली असते. याचबरोबर पाणी तसेच स्वच्छतागृहांची वानवा त्या ठिकाणी आहे. तेव्हा या सर्व सोयी, सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संस्था, कोल्हापूर यांच्यावतीने बेळगावचे जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांच्याकडे केली आहे.
सैंदत्ती येथील रेणुका देवीला कोल्हापूर जिल्हय़ातून लाखो भक्तगण दरवषी येत असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे भक्त या ठिकाणी आले नाहीत. मात्र आता कोरोना कमी झाल्यामुळे भक्त मोठय़ा प्रमाणात येणार आहेत. त्यामुळे योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध कराव्यात, असे या निवेदनात म्हटले आहे. यात्रोत्सव काळात पार्किंगची सोय करावी. स्वच्छतागृहे उपलब्ध करावीत, जोगुळभांवी येथे देखील व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे.
भक्तांसाठी मंदिर खुले करावे. जेणे करुन भक्तांना दर्शन घेता येईल. पोलिसांना देखील महाराष्ट्रातील भक्तांना योग्य प्रकारे सहकार्य करण्याची सूचना करावी, ज्या भक्तांनी दोनवेळा लस घेतली आहे त्यांना विनाअट यात्रेला येण्यास मुभा द्यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला ज्वोल्ले यांच्या नावे हे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार विलासराव पाटील, उपाध्यक्ष प्रदीप साळोखे, सचिव प्रशांत खाडे, अस्कीन आजरेकर, श्रीकांत कारंडे, किरण मोरे, अनिता पवार, अनिल देवणे, उदय पाटील, सुरेश बिरंबोळे, अनिल पवार यांच्यासह कोल्हापूर येथील भक्त उपस्थित होते.