ऑनलाईन टीम / मुंबई :
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. आपल्या देशाची स्थिती चिंताजनक आहे. या संकटाला रोखण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. त्यांनी आज फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, कोरोनावर मात करता येते. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लस वर काम सुरू आहे. सध्याचा वेळ देश बांधायची आहे. आपल्याला देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणायची आहे. त्यामुळे सोशल मीडिया वरून टीका टिप्पणी करणं सोडून द्या असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. टीबीमुळे महिन्याला एक लाख लोक मरतात. त्यामुळे महाराष्ट्रात कोणीही थुंकणार नाही यासाठी कॅम्पेन केले पाहिजे, असं ही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वात जास्त टेस्ट होत आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि इतर मंत्री चांगले काम करत आहेत.
यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठ्या भावाप्रमाणे धीर देतात. तसेच त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र आज मोठ्या भावाप्रमाणे पाहत आहेत.
शिक्षक आणि मुलांमध्ये खूप गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता हा वेळ अभ्यासासाठी बोनस मिळाला असे समजून भरपूर अभ्यास करा. परीक्षांबाबत चे चित्र 10 मे पर्यंत स्पष्ट होईल. असं ही त्यांनी यावेळी सांगितले.
या संकटाच्या काळात कर्तव्य बजावत असलेले पोलीस कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांचे कौतुक केले. तसेच या संकटात काम करत असताना प्राण गमावलेल्या पोलिसांना सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली अर्पित केली.
लॉक डाऊन शिथिल होण्याची मी देखील वाट पाहत आहे. लॉक डाऊन शिथिल करण्याबाबत केंद्र सरकारचा देखील विचार चालू आहे. असं ही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र यासाठी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. वेळोवेळी हात धुवा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्ससिंग चे पालन करा असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले आहे.