ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याबाबतचा कोणताही निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला नाही. त्यामुळे सोशल मीडिया आणि इतर वाहिन्यांवर येणारे यासंदर्भातील वृत्त संभ्रम निर्माण करणारे आहे. त्यामुळे लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच गैरसमज पसरवणारे मेसेज किंवा पोस्ट फॉरवर्ड करू नयेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज्यात 15 जूनपासून पुन्हा लॉकडाऊन सुरू होणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे लोकांचा संभ्रम वाढत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.
ठाकरे म्हणाले, आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरु करीत आहोत. पण लॉकडाऊन उठवतो आहोत याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही. बाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतूनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवन पद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीचअंगिकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.