म. ए. समितीचे नेते किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : शहापूर येथे हुतात्मा मधू बांदेकर यांना अभिवादन
प्रतिनिधी / बेळगाव
इतिहास हा बदलता येत नाही, परंतु भूगोल बदलता येतो. सीमालढा लोकशाही व शांततेच्या मार्गाने 65 वर्षांपासून सुरू आहे. तेलगू लोकांनी आपली मागणी लावून धरल्यामुळे आज तेलंगणा स्वतंत्र झाला. याच प्रद्धतीने महाराष्ट्रानेही सीमाप्रश्नाची मागणी केंद्राकडे लावून धरावी, असे विचार म. ए. समितीचे नेते व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी व्यक्त केले.
कचेरी गल्ली, शहापूर येथे हुतात्मा मधू बांदेकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री, माजी नगरसेवक नेताजी जाधव, विजय भोसले, शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे उपस्थित होते.
अन्यथा, विशाल गोमंतक झाला असता
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी वेळ लागत असल्याने शिवसेनाप्रमुख दि. बाळासाहेब ठाकरे यांनी विशाल गोमंतक ही संकल्पना मांडली होती. सीमाभाग व महाराष्ट्रातील काही भाग हा गोव्याला जोडण्याची मागणी त्यांनी त्यावेळी केली होती. परंतु यशवंतराव चव्हाणांना पंतप्रधान व्हायचे असल्याने त्यांनी दोन राज्ये करण्यास अनुत्सुकता दर्शविल्यामुळे हा प्रस्ताव राहिला, अशी आठवण किरण ठाकुर यांनी काढली.
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी चालढकल
माजी नगरसेवक नेताजी जाधव म्हणाले, देशासमोरचे इतर प्रश्न तातडीने सोडविले जातात. परंतु सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कायम चालढकल केली जात आहे. सीमाप्रश्न ही केवळ सीमावासियांची जबाबदारी नसून ती महाराष्ट्राचीही आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आप्पा चतुर यांनी प्रास्ताविक केले. हुतात्मा मधू बांदेकर यांचे बंधू सदाशिव बांदेकर यांनी सीमाप्रश्न लवकर सुटावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी विजय बांदेकर, माजी नगरसेवक विजय भोसले, मनोहर हलगेकर, हेमंत जांगळे, राजू शहापूरकर, भरमा जांगळे, राजू गावडोजी, प्रवीण शहापूरकर, विनायक वसुलकर, भूषण जांगळे, विष्णू जांगळे, रमेश बांदेकर, विजय जांगळे, संदीप पाटील, यल्लाप्पा जांगळे, राजू चतुर, मारुती चतुर, अतुल पारिश्वाडकर, कपिल कडोलकर, मनोज जांगळे यासह म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.