ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील लोकांमध्ये आणि मातीत एक वेगळीच खासियत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा अर्थ सांगण्यासाठी भाषा विज्ञानाकडे जायची गरज नाही. तुमचे हृदयच महाराष्ट्राचा अर्थ सांगेल. महाराष्ट्र म्हणजे भारताचं एक महान राज्य आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज मुंबईत आहेत. त्यांच्या हस्ते आज राजभवनातील दरबार हॉलचं लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. कोविंद म्हणाले, गेल्या साडेचार वर्षात मी 12 वेळा महाराष्ट्रात आलो आहे. महाराष्ट्रातील लोकांमध्ये आणि मातीत एक वेगळीच खासियत असल्याने महाराष्ट्राशी माझा ऋणानुबंध राहिला आहे. महाराष्ट्राच्या महानतेचे अधिक आयाम आहेत. त्यांचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. महाराष्ट्रातील केवळ महापुरुषांची नावे घेतली तरी यादी कमी पडेल. छत्रपती शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेशवर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारखे अनेक महापुरुष महाराष्ट्राने दिले. विचारधारा वेगळी असेल पण मानवजाताची उत्कर्ष करणे हाच सर्वांचा उद्देश राहिला आहे.
महाराष्ट्राची भूमी संताची आहे, अन्यायाविरोधात लढणाऱ्या वीरांची धरती आहे. देशभक्त आणि भगवत भक्तांची आहे. महाराष्ट्र हे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. अजिंठा ऐलोरा लेण्या आपल्याला समृद्ध करतात. महाराष्ट्रात प्रतिभा आणि निसर्गाचा विलोभनीय संगम आहे. इथलं आदरतिथ्य प्रसिद्ध आहे, अशा शब्दात रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राची महती विशद केली.