ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन तासिकांनाच प्रतिसाद : महाविद्यालये अडकली कोरोनाच्या संकटात
प्रतिनिधी / बेळगाव
आठ महिन्यांनंतर खुली झालेली पदवी महाविद्यालये पंधरा दिवसांनंतरही सुनीसुनीच आहेत. यामुळे कॉलेजचा कट्टा, कँटीनचा नाश्ता, मुलांचा घोळका, गप्पांची रंगत, लेक्चर बंक करण्याचा आनंद ही महाविद्यालयीन दुनियादारी कोरोनाच्या संकटात अडकून पडली आहे. पदवी महाविद्यालयात केवळ 10 टक्के इतकीच विद्यार्थ्यांची उपस्थिती असून ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन तासिकांनाच चांगला प्रतिसाद लाभत आहे. यामुळे नेहमीच गजबजणाऱया महाविद्यालयीन परिसरात मोजक्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत निरव शांतताच अनुभवत आहे.
2020-21 या शैक्षणिक वर्षात कोरोनाच्या संकटात महाविद्यालये लॉकडाऊन झाली होती. परिणामी यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे सहा महिने सुटीतच गेले. शिक्षण मंडळाच्या आदेशानुसार 17 नोव्हेंबरपासून महाविद्यालये खुली करण्यात आली. महाविद्यालये सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला असून महाविद्यालयीन परिसरात फेरफटका मारला असता पदवीच्या वर्गात केवळ हाताच्या बोटावर मोजणारे विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित आहेत. कोरोना चाचणीचा अहवाल आणि पालकांचे संमतीपत्र, शिवाय मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे भान आणि सॅनिटायझर्सचा वापर या बाबी सक्तीच्या आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीत एका वर्गात केवळ 10 ते 20 विद्यार्थी असल्याचे दिसून येत आहे.
प्रवासाची अडचण
काही विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात. यामुळे विद्यार्थ्यांना बसचा आधार घ्यावा लागतो. मात्र, अजून बसपासची व्यवस्था नसल्याने रोजचा प्रवास व खर्च विद्यार्थ्यांना परवडणारा नाही. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱया विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे. शिवाय पालकांमध्ये भीती असून विद्यार्थ्यांना महाविद्यालयांना पाठविण्यासाठी प्रतिसाद कमी आहे. रोजचा बसचा प्रवास आणि येणारा संपर्क यामुळे कोरोनाचे संकट नको, अशा भावना व्यक्त करत विद्यार्थी येत नसल्याचे दिसून येत आहे.
महाविद्यालयांना उपस्थित राहताना कोरोना चाचणीचा अहवाल असणे आवश्यक आहे. शिवाय रोज महाविद्यालयांना येणे म्हणजे कोरोनाची भीती आहे. यामुळे ऑफलाईन क्लासेसपेक्षा ऑनलाईन क्लासेसनाच अधिक प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून आले. रोज होणारे ऑफलाईन क्लासेसचे रेकॉर्डींग करून सदर व्हिडिओ व्हॉट्स ऍप ग्रुपवर पाठविण्यात येत आहेत. यामुळे महाविद्यालये सुरू झाली असली तरी वर्दळ नसल्याचे चित्र महाविद्यालयात पाहायला मिळत आहे.
गजबजणारा परिसर शांतच
सध्या महाविद्यालयात प्रवेश करताना सॅनिटायझर, मास्क तसेच सामाजिक अंतराचे भान राखणे गरजेचे असल्याच्या सूचना असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. महाविद्यालयात विनाकारण फिरण्यावर बंदी असून यामुळे महाविद्यालये सुरू असली तरी परिसर शांतच आहे.