आगामी 2027 पर्यंत वाहने बाजारात आणण्याची तयारी
नवी दिल्ली
देशातील वाहन कंपनी महिंद्रा ऍण्ड महिंद्राने दिलेल्या माहितीनुसार 2027 पर्यंत एसयूव्ही आणि हलके वाणिज्य वाहन (एलसीवी) या वर्गात जवळपास 16 इलेक्ट्रिक वाहनांचे सादरीकरण करण्याची योजना आखली जात आहे. कंपनी या योजनेअंतर्गत भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी वर्गात आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये कंपनीने 2025 पर्यंत आपल्या एकूण महसूलात 15 ते 20 टक्क्यांची वृद्धी करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.
इलेक्ट्रिक वाहनांवर कंपनी येत्या काळात लक्ष देणार असून महिंद्रा ऍण्ड महिंद्रा प्रथमच ईव्ही व्यवसायात 3,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीची योजना आखणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. या व्यवसायात अधिकाधिक विस्तार करण्याप्रती कंपनी प्रयत्नरत असणार आहे.
लवकरच नवी मॉडेल्स उतरणार
एसयूव्ही वर्गात आम्ही 2027पर्यंत 13 नवीन मॉडेल सादर करण्याचा विचार करत आहोत. यात जवळपास 20 टक्के हिस्सा हा इलेक्ट्रिक वाहनांचा राहणार असल्याचे कंपनीचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरिकर यांनी सांगितले आहे.