वाजपेयी सरकारमध्ये होते मंत्री
वृत्तसंस्था/ कोलकाता
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते सत्यव्रत मुखर्जी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे. बालीगंज (कोलकाता) येथील वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सत्यव्रत मुखर्जी हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय राज्य मंत्री होते. याचबरोबर मुखर्जी भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल देखील राहिले आहेत. सत्यव्रत मुखर्जी यांचा जन्म बांगलादेशात 8 मे 1932 रोजी झाला होता. कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले होते. 1999 मध्ये कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द सुरू केली होती. मुखर्जी हे सप्टेंबर 2000 पासून जून 2002 पर्यंत रसायन तसेच खते राज्यमंत्री होते. तर जुलै 2002 ते ऑक्टोबर 2003 पर्यंत वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. सत्यव्रत यांची प्रकृती काही काळापासून बिघडली होती, याचमुळे त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी दिग्गज नेत्याच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.