वसुली विभागाची साताऱयात धडाकेबाज कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
सर्वसामान्य करदाता हा पालिकेचा कर न चुकता भरत असतो. परंतु काही बडी मंडळीच पालिकेचा कर चुकवत असतात. वरुन पालिकेच्या विरोधात कोर्टात जात असतात. अगदी कोर्टात बाजू मांडताना पालिका कशी चुकीची याचा किस पाडत असतीलही. परंतु कर मात्र भरण्यासाठी सढळ हात करणार नाहीत. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी कोणाचीही मुलाहिजा ठेऊ नका, जो थकबाकीदार आहे त्याच्यावर कडक ऍक्शन घ्या, अशा सूचना वसुली विभागाला दिलेल्या आहेत. त्या सुचनेनुसार वसुली विभागाने पालिकेचे 19 लाख रुपये थकवलेले सातारचे खासदार उदयनराजे यांचे कट्टर कार्यकर्ते विलास आंबेकर यांचे चार गाळे सिल केले. पालिकेच्या या कारवाईचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
सातारा पालिकेची घटपट्टी, पाणीपट्टीसारखे कर दरवर्षी मागणी होत असते. त्या कराचा भरणा सर्वसामान्य लगेच भरत असतो. परंतु सातारा शहरातील काही बडी मंडळी ही कर थकवत असतात. त्यामुळे पालिकेकडे अशा मंडळींची मोठी यादी आहे. त्या मंडळींना पालिकेच्या वसुली विभागाकडून अनेकदा नोटीस गेलेली आहे. सध्या प्रशासक म्हणून मुख्याधिकारी अभिजित बापट हे आहेत. त्यांनी वसुली विभागास सक्त सूचना दिलेल्या आहेत की बडय़ा मंडळींची वसुली झाली पाहिजे. मग तो कोणीही असो, वसुली करण्याचे सर्वाधिकार वसुली विभागाला दिलेले आहेत. त्यामुळे वसुली विभागाचे प्रमुख असलेले प्रशांत खटावकर यांनी सोमवारी आपल्या पथकासह जावून खासदार उदयनराजे यांचे कट्टर समर्थक विलास आंबेकर यांचे रोहन हाईट्स या इमारतीतील चाळ गाळे सिल केले. त्यांनी तब्बल 19 लाख 3 हजार 412 रुपयांचा कर थकवला होता. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील इतर बडय़ा धेंडाचेही धाबे दणाणले आहेत.