प्रतिनिधी / कराड
1971 साली झालेल्या भारत -पाकिस्तान युद्धात निर्माण झालेल्या बांगलादेश मुक्ती संग्रामला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मरणार्थ काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रीय स्तरावर काही उपक्रम घेतले जाणार आहेत. त्या उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक समिती गठीत केली आहे. ही समिती माजी संरक्षण मंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते ए के अँटोनी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली आहे. या समितीमध्ये लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी संरक्षण राज्यमंत्री जितेंद्र सिंह, श्रीमती किरण चौधरी, श्री उत्तम कुमार रेड्डी, मेजर वेद प्रकाश, श्रीमती शर्मिष्ठा मुखर्जी, कॅप्टन प्रवीण डवर आदी सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारत व पाकिस्तान यांच्यामधील युद्धात भारताने पाकिस्तानला हरवून भारताने निर्माण केलेल्या बांगलादेशला 50 वर्षे पूर्ण होत असल्याने या घटनेच्या स्मरणार्थ देशभर उपक्रम घेतले जाणार आहेत. यासाठी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या सूचनेवरून ही समिती स्थापन केली आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने पाकिस्तानवर विजय मिळवत पाकिस्तानचे दोन तुकडे करीत बांगलादेशची 1971 साली निर्मिती केली होती. याच घटनेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत.
भारत – पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला हरवून बांगलादेशची निर्मिती करण्यात आली हा दिवस 16 डिसेंबर ला विजय दिवस म्हणून दरवर्षी देशात साजरा केला जातो. या घटनेच्या स्मरणार्थ देशभर काँग्रेस पक्षाकडून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमांची रचना व अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावर एक समिती स्थापन केली आहे.