प्रतिनिधी / मुंबई
बेछूट आरोप करत माझा आवाज दाबण्याचा किटीट सोमय्या यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा पलटवार करत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याचीही माहिती दिली.
मुश्रीफ म्हणाले की, कारखान्यांबद्दल सोमय्या यांनी जे आरोप केले होते ते आरोप गेल्या आठ दहा वर्षांच्या काळातील होते. माझ्या मंत्रिपदाच्या काळातील प्रकरण काढण्याचे आव्हान त्यांना दिले होते. त्यामुळे काहीतरी आरोप करायचे म्हणून सोमय्यांनी ग्रामविकास विभागासंदर्भात आरोप केला. ग्रामविकास विभागासंदर्भात 10 जानेवारी 2021 ला आपण जाहिरात प्रसिद्ध केली. ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्या लेखापरिक्षणात सूत्रता असावी यासाठी आपण ही व्यवस्था आणली होती. ही व्यवस्था ऐच्छिक होती. 10 मार्च 2021 ला ऑर्डर दिल्यानंतर या कंपनीला एकही पैसा दिलेला नाही, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
तिसरा घोटाळा जावईशोध
हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने 1500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मी आणि माझ्या जावयाचा कोणत्याही घोटाळ्याशी काहीही संबंध नाही. हा घोटाळा म्हणजे सोमय्यांचा जावईशोध असे सांगून मुश्रीफ यांनी सोमय्यांनी माझ्या परिवारावर वारंवार आरोप करु नयेत, असा इशारा देखील दिला. सोमय्या करीत असलेल्या आरोपातील दुसऱया घोटाळ्याचा उल्लेख दिसला नाही. त्यांनी अशी निराधार वक्तव्ये करु नये यासाठी बंदी आणण्यासाठी याचिका दाखल केली होती. आज त्याची सुनावणी न्यायालयाने ठेवली होती. परंतु त्यांनी नोटीस घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. अन्यथा आज सुनावणी होऊन एकतर्फी निकालाची शक्यता होती, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
माझ्या जावायाचे, कुटुंबाचे नाव घेऊ नका
मुश्रीफ म्हणाले, सोमय्या यांना सूचना करेन की, माझ्या जावयाचे नाव आणि कुटुंबाचे नाव ते घेत आहेत. काही कारण नसताना नाव बदनाम करण्याचे कारस्थान करत आहेत. हे बरोबर नाही. राजकीय आणि सामाजिक जीवनात मेहनत करुन नाव करत असतो आणि कोणीतरी येऊन चिखलफेक करावी हे काही चालणार नाही, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे