शेतकऱ्यांबाबत केलेल्या मागण्यांची मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्याने व्यक्त केली खंत..
वार्ताहर / भिलवडी
मला शेतकऱ्यांसाठी जगायचे माहित आहे. शेतकऱ्यांसाठी मरायचे माहित आहे. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला शब्द पाळला नाही. मला भेटू देत नाहीत. त्यामुळे येत्या १५ ऑगस्ट पर्यंत मला मुख्यमंत्री साहेबांनी भेटायला नाही बोलावले तर मी कोणत्याही क्षणी मातोश्री समोर आत्मदहन करणार असा इशारा वाळवा तालुक्यातील साखराळे येथील विजय जाधव यांनी भिलवडी येथे दिला आहे.
बैलांचे संरक्षित जंगली प्राणी म्हणून वर्गीकरण केल्यामुळे बैल शर्यतीवर बंदी आली. देशी गाय व बैलांचे जतन करा असे संविधानात नमूद असताना देखील केवळ बैलाचा जंगली प्राणी म्हणून नामोल्लेख केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची परंपरा असलेल्या बैलांच्या मैदानी खेळावरती मर्यादा आल्या आहेत. संविधान कलम ४८ मध्ये शेतकऱ्यांचे जुंपनीचे जनावर म्हणून बैलाचा उल्लेख आहे. बैल जंगली प्राणी आहे तर आमची जुंपणीची जनावरे कोणती आहेत ? चार वर्षापूर्वी नाशिक येथे शेतकरी मेळावा होता. तिथे आपले सरकार असते तर मागण्या मान्य केल्या असत्या असे मा. उध्दव ठाकरे बोलले होते, त्यावेळी मी तुमचे सरकार स्थापन होईपर्यंत व माझ्या मागण्या मान्य होई पर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ त्यांच्या समोर घेतली होती. आता शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर ते मला भेटायला तयार नाहीत, अनवाणी पायांनी फिरुन मला शारिरीक व्याधी झाली. ऑपरेशन करावे लागले.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी गेली चार ते पाच वर्षे अनवाणी पायाने फिरून पाठपुरावा केला आहे. घरची परिस्थिती हलाखीची असून कर्ज माफीमध्ये माझे कर्ज माफ केले नाही.
कर्जबाजारीपणामुळे जप्तीची वेळ आली आहे. अशावेळी उदरनिर्वाह चालविण्यासाठी शेतकरी बांधवाकडून वर्गणी गोळा करून रक्कम दिली जाते. त्यावर आमचे कुटुंब चालत आहे. मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द पाळला नाही. ते भेटायला ही तयार होत नाहीत. ते माझे निवेदन स्वीकारत नाहीत त्यामुळे येत्या १५ ऑगस्ट पर्यंत जर मुख्यमंत्री साहेबांनी भेटायला नाही बोलावले तर कोणत्याही क्षणी मातोश्री समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा साखराळे तालुका वाळवा येथील विजय जाधव यांनी येथे दिला. जाधव हे भिलवडी येथील मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना निवेदन देण्यासाठी आले असता, त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू दिले नाही. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.